ग्रीन हेरिटेज संस्था : शासकीय यंत्रणेस कामाला लावण्याची गरज भंडारा : पावसाने पाणी नदी, नाल्यांद्वारे वाहून न जाता त्याची साठवणूक, जपणूक करावी व पावसाच्या प्रत्येक थेंबाचा सन्मान करावा, असे आवाहन ग्रीनहेरिटेज पर्यावरण संस्थेने केले आहे.यंदा देशात १०६ टक्के पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर झालेला आहे. विदर्भ, मराठवाड्यात चांगल्या पावसाचे संकेत आहे. शेतकऱ्यांसाठी हा शुभ संकेत आहे. साऊथ एशियन क्लायमेट आऊटलुक फोरमने मान्सूचा सविस्तर अभ्यास करून संपूर्ण दक्षिण आशियासाठी जून ते सप्टेंबर या कालावधीत मनमुदाद पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे.सॅस्कॉफ-८ ही संस्था आंतराष्ट्रीय दर्जाची अत्याधुनिक हवामान अंदाजाची यंत्रसामुग्री वापरते व तीचे अंदाज नेहमीच तंतोतंत खरे उतरतात. या संस्थेने केलेल्या अंदाजानुसार कोकणात ७० टक्के जास्त व मराठवाड्यात सरासरी पेक्षा ४० टक्के जास्त पाऊस पडणार आहे. अतिवृष्टीचे संकट ही निर्माण होऊ शकते. म्हणूनच शेतकऱ्यांनी सावध असावे. यावर्षीच मान्सून वेळेवर धडकण्याचा अंदाज आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने पावसाचे थेंब अन थेंब आपल्या शेतात कसा मुरवता येईल यासाठी या क्षणापासून प्रयत्न करावयास हवेत. गावात पाणी नाही म्हणून शेत उघड्यावर टाकून शहराकडे धाव घेणे आता परवडण्यासारखे नाही. येणारे वर्ष म्हणजे खरीप रब्बीचा हंगाम दुष्काळ नसून सुख समृद्धीचा आहे.मान्सूनचा अंदाज शेतकऱ्यांना आनंद देणारा नक्कीच आहे परंतु शासनाने देखील जास्त सकारात्मकता स्विकारून शासकीय यंत्रणेस कामाला लावण्याची गरज आहे. मनरेगा अंतर्गत नदी, नाले रूंदीकरण व जलयुक्त शिवाराची कामे तातडीने पूर्ण करून पावसाचा एक थेंब सुद्धा वाया जाणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी. अतिवृष्टीच्या अंदाजाची तयार कागदावर न करता बांधावर करण्यात यावी, अशी मागणी ग्रीनहेरिटेज पर्यावरण व सामाजिक संस्थेतर्फे करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)
पावसाच्या थेंबांचा सन्मान करा
By admin | Updated: May 19, 2016 00:31 IST