पटोले यांचे प्रतिपादन : आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा भंडारा : जिल्ह्याचा विकास होण्याच्या दृष्टिने पाऊल टाकलेले आहे. तरीही शैक्षणिक व अन्य क्षेत्रात जिल्हा मागासलेला आहे. जिल्ह्याला लागलेला हा मागासलेपणाचा कलंक पुसून काढण्यासाठी प्रयत्नरत असून त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हा परिषद सभागृहात आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर या होत्या. अतिथी म्हणून जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, कृषी सभापती नरेश डहारे, बांधकाम सभापती विनायक बुरडे, महिला सभापती शुभांगी राहांगडाले, शिक्षणाधिकारी (माध्य) किसन शेंडे उपस्थित होते.यावेळी खा. पटोले म्हणाले, सावित्रीमाई फुले यांच्यामुळे समाजात महिला व शिक्षिकांना मानाचे स्थान आहे. सावित्रीमाई या प्रेरणास्त्रोत असून त्यांचा वसा जोपासा, पुरस्कार छोटा असो किंवा मोठा त्याला मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. पुरस्कारासाठी शिफारसपत्रांच्या प्रस्तावाला स्थान न देता शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार द्यावे. सर्वांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्याला समानता व समरसतेचे शिक्षण देण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या शिक्षकांमध्ये प्रतिभा आहे. मात्र, शिक्षक हे संघटनांच्या निवडणुकीत जास्त रुची घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम पडत असल्याने शिक्षकांनी शिक्षणाचे पवित्र कार्य योग्य प्रकारे करावे, असा सल्ला दिला. अतिथींच्या हस्ते पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा शाल व मानचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)शिक्षण सभापतींची कार्यक्रमाला दांडीजिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती राजेश डोंगरे हे शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. शिक्षण विभागाची जबाबदारी खांद्यांवर असलेल्या डोंगरे यांनीच कार्यक्रमाला दांडी मारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळातील हा पहिलाच कार्यक्रम असल्याने त्यांची उपस्थिती गरजेची होती. मात्र, कार्यक्रम संपेपर्यंत ते कार्यक्रमस्थळी पोहोचले नव्हते. यासंदर्भात संपर्क साधला असता ते म्हणाले, प्रकृती अस्वाथ्यामुळे येऊ शकलो नाही.निमंत्रण पत्रिका देण्याचा शिक्षण विभागाला विसर शिक्षक दिवस हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले होते. मात्र, त्याची माहिती माध्यमांना दिली नाही. निमंत्रण पत्रिकाही दिल्या नाहीत. पत्रिकेमध्ये खासदार नाना पटोले यांचे नावही नव्हते. परंतु त्यांना तोंडी निमंत्रण देताच त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांची हजेरी ही शिक्षण विभागाला चपराक ठरली.
मागासलेपणाचा कलंक पुसून काढू
By admin | Updated: September 6, 2015 00:25 IST