३६ कुटुंबीयांना मदत : सर्वाधिक आत्महत्या लाखांदूर तालुक्यात भंडारा : नापिकी व कर्जाला कंटाळून ४५ शेतकऱ्यांनी वर्षभरात मृत्यूला कवटाळले. जिल्हास्तरीय समितीकडून शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नऊ प्रकरण अपात्र ठरविली. पात्र ठरलेल्या प्रस्तावात मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबाला ३६ लाखांची मदत दिल्याचे दिसून येते. वर्षाच्या प्रारंभीच म्हणजे जानेवारी महिन्यात १० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. फेब्रुवारी व मार्च महिन्यात चार, एप्रिल महिन्यात पाच, मेमध्ये चार, जून सहा, जुलै पाच, आगस्ट दोन, सप्टेंबर तीन, आॅक्टोंबर दोन, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक आत्महत्या या लाखांदूर तालुक्यात झाल्या असून अकरा शेतकऱ्यांनी जीवन संपविले. लाखनी तालुक्यात आठ शेतकऱ्यानी मृत्यूला कवटाळले. त्यानंतर साकोली व पवनी तालुक्यातील प्रत्येकी सात तर तुमसर व भंडारा तालुक्यात प्रत्येक पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले. जिल्ह्यातील शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चित्र आहेत. शेतीसाठी मुबलक पाण्याची गरज आहे. पंरतु पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी असमानी व सुलतानी संकटाचा सामाना करावा लागतो. यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसला. मान्सूनने उशीरा हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्याचे नियोजन कोलमडले. पेरणी केली पण पावसाअभावी रोवणी होऊ शकली नाही. कधी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस गारपीट, रोग किडीचा प्रादुर्भाव यामुळे पिकाचे नुकसान होत गेले. परिणामी शेतकऱ्यांना खरीप हंगामात अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळाले नाही. तद्वतच लागवडीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखने एक मोठे आवाहन शासनापुढे असून समाजासमोर चिंतेचा विषय बनला आहे. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांची आत्महत्या ४५ पैकी नऊ प्रकरणे अपात्र
By admin | Updated: December 31, 2016 01:41 IST