लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संमिश्र पीक पद्धतीचा अवलंब केल्यास आवश्यक अन्नद्रव्य घटक आहारात मिळून आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. परंतु, सध्या शेतकरी एकाच शेतात एकाच पिकाचे वाण वारंवार घेत आहेत. ही एक पीकपद्धती शेती, शेतकरी आणि मानवी आरोग्याचे संतुलन बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. शेतकऱ्यांनी शेतीचे आरोग्य व पीक क्षमता सुदृढ ठेवण्यासाठी संमिश्र पीकपद्धतीचा अवलंब करणे काळाची गरज आहे. सतत एकच वाण पुन्हा पुन्हा पेरणे शेतीची उत्पादनक्षमता घटण्यास कारणीभूत ठरत आहे.
यांत्रिकीकरण आणि आधुनिक संकरीत वाण आल्याने एकाच जमिनीवर दोनपेक्षा अधिक वेळा उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. धान, सोयाबीन, तूर, ऊस, कापूस, उडिद हेच पीक वारंवार घेतले जातात. परंतु, शेतीची प्रत आणि मानवी आरोग्यासाठी आवश्यक इतर पिके घेणे गरजेचे आहे. त्यासाठी चक्री पीक पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन कृषी अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
जिल्ह्यात मका, धान, कापूस आदी मुख्य पिकांचे उत्पादन घेतले जाते. मूग, मटकी, चवळी, मसूर, वटाणा आदी पिकेही घेतली जातात. परंतु, तेलबिया पीक जवस, करडी, मोहरी, सोयाबीन, भुईमूग याकडे अद्यापही अनेक शेतकऱ्यांकडून पाठ फिरवली जाते. भाजीपाल्यात कारले, भोपळा, दोडका, गवार, वाल, तोंडली तसेच पालेभाज्या उगविल्या जातात. तसेच फळ पीक आंबा, पेरू, चिकू, जांभूळ, सीताफळ, मोसंबी, रामफळ, बोरे आदींचे उत्पादन फारसे उत्पादन होत नाही.
तेलबिया उत्पादनाकडे होतेय दुर्लक्षअन्नघटकात आरोग्याच्या दृष्टीने तृणधान्य, द्विदलधान्य, एकदल धान्य, तेलबिया, फळ आदींचे महत्त्वाचे स्थान असते. मात्र, याकडे सरळ तेलबिया उत्पादनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. संमिश्र पीक पद्धतीचा अवलंब केल्यास आवश्यक ते सर्व अन्नद्रव्य घटक आहारात मिळून आरोग्य सुदृढ राहण्यास फायदेशीर ठरेल तसेच शेतीची प्रतसुद्धा संतुलित राहण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
"शेतकरीबांधवांनी आपली आणि शेतीची गरज म्हणून चक्री पद्धतीने पिकांची लागवड करावी. अन्नधान्य, कडधान्य पिकांसह तेलबिया, फळ उत्पादनांकडेही लक्ष द्यावे. रानभाज्यांचे महत्त्व ओळखून त्यादेखील जतन कराव्यात."- सुनील भडके, तालुका कृषी अधिकारी, मोहाडी.