जिल्ह्यात पूरपरिस्थितीने ४८ तासानंतरही जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 05:00 AM2020-09-01T05:00:00+5:302020-09-01T05:01:52+5:30

गत काळात १९९४ मध्ये ऐन पोळ्याच्या दिवशी पिपरीला महापुराने वेढले होते. त्यावेळेस परिस्थिती पाहता यावर्षी म्हणजे २०२० पूर महाभयंकर होता. यात पिपरी येथील अख्खे गाव उद््ध्वस्त झाल्यागत आहे. घरातील जीवनावश्यक वस्तू, शेतकऱ्यांचे वर्षभराच्या धान्याची नासाडी झाली आहे. येथील ९० टक्के घरे भूईसपाट झाली. ग्रामपंचायत येथील आवश्यक दस्ताऐवज पाण्याखाली सापडल्याने खराब झाली. तसेच जिल्हा परिषद शाळेतील १००-१५० वर्षापूर्वीचा शैक्षणिक दस्ताऐवज खराब झाला.

Life in the district is disrupted even after 48 hours due to floods | जिल्ह्यात पूरपरिस्थितीने ४८ तासानंतरही जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यात पूरपरिस्थितीने ४८ तासानंतरही जनजीवन विस्कळीत

Next
ठळक मुद्देवैनगंगेला पूर कायम : अनेक घरांची पडझड, हजारो हेक्टरमधील धानपीक पाण्यात, महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मध्यप्रदेशातील संजय सरोवरचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगेला पूर आला असून गत ४८ तासांपासून अनेक गावे अजूनही पाण्याखाली आहेत. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री उशीरापर्यत राष्ट्रीय महामार्गावर १५ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभर भंडारा - लाखनी, भंडारा - नागपूर मार्ग बंद होता. पूर ओसरत असला तरी आजही हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आहे.
खरबी परिसरात घरांची पडझड
खरबी (नाका) : भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथील चार घरे संततधार पावसाने पडली. खराडी येथील मारोतराव हिवसे यांच्या घरात एक फुट पाणी जमा झाले. परिसरात सतत पडत असलेल्या पावसाने सोयाबीन पिक उद्ध्वस्त झाले असून पाण्याखाली आले आहेत. राजेदहेगाव येथील वसंता विठोबा शेंडे, फागो श्रीपत शेंडे, रामदास कोंडबा शेंडे, खुशाल किसन ढोबळे, दौलत लक्ष्मण ढोबळे यांच्या घरांची पडझड झाली असून पावसाने अन्नधान्य ओलेचिंब झालेले आहेत. पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून गरजूंना तात्काळ घरकुलाचा मोबदला देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य गिरीश ठवकर यांनी केली आहे.
जुनी पिपरी येथील पूर ओसरला
जवाहरनगर : गत दिवसात संततधार पाऊस पडल्याने पेंच व चौराई धरण ओसंडून वाहत होते. धरणाचे दरवाजे सहा मीटरने उघडल्याने धरण लगतच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. परिणामी जुनी पिपरी पुर्णत: पाण्याखाली गेली. येथील ९० टक्के घरे भूईसपाट झाली. पेवढा व लोहारा येथील परिस्थिती तशीच आहे. येथील नागरिक कुटुंबासह पुनर्वसनस्थळी नवीन पिपरी येथे पलायन करीत आहे.
गत काळात १९९४ मध्ये ऐन पोळ्याच्या दिवशी पिपरीला महापुराने वेढले होते. त्यावेळेस परिस्थिती पाहता यावर्षी म्हणजे २०२० पूर महाभयंकर होता. यात पिपरी येथील अख्खे गाव उद््ध्वस्त झाल्यागत आहे. घरातील जीवनावश्यक वस्तू, शेतकऱ्यांचे वर्षभराच्या धान्याची नासाडी झाली आहे. येथील ९० टक्के घरे भूईसपाट झाली. ग्रामपंचायत येथील आवश्यक दस्ताऐवज पाण्याखाली सापडल्याने खराब झाली. तसेच जिल्हा परिषद शाळेतील १००-१५० वर्षापूर्वीचा शैक्षणिक दस्ताऐवज खराब झाला. एकंदरीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. कन्हान नदीच्या आणि वेगवान पुरामुळे एनटीसीपी मौदा या ठिकाणाहून विद्युत पुरवठा करणारी १० केव्ही टॉवर विद्युत खांब कोसळल्याने पिपरी पंपहाऊसमधून मौदा विद्युत कारखान्याला पाणी पुरवठा करणारे काम ठप्प झाले. परिणामी वीज निर्मिती बंद पडली.
लोहारा येथील २९ कुटुंबांना मध्यरात्री १२-३० वाजेपर्यंत एसडीआयएफ द्वारे बाहेर काढण्यात आले. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. या दरम्यान पिपरी येथील तलाठी एम.एन. रामटेके, ग्रामसेवक हटवार, सावरी कोंढी येथील तलाठी जगताप, ठाणेदार सुभाष बारसे आपल्या चमूसह सतत दोन दिवस तळ ठोकून होते.
पूरपीडित नागरिकांना ग्रामपंचायत सदस्य गिरीश ठवकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुमेध शामकुवर, समता सैनिक दल जवाहरनगर युनीट, बजरंग दलाचे संजय पटले यांनी मदत केली. सोमवारी सकाळी पाच वाजताच्या सुमारास पूर ओसरला होता. गावकरी आपआपल्या घरातील साहित्यांची शोधाशोध करण्यास व सुरक्षित स्थळी पुनर्वसन पिपरी येथे पलायन करण्यात व्यस्त होते. गावात चिखल असल्यामुळे व विद्युत पुरवठा खंडीत असल्याने गावात गर्दी वाढू लागली. लोणारा येथील संपूर्ण विद्युत खांब भूईसपाट झाले. शासनाकडून तातडीने मदत मिळण्याची अपेक्षा गावकरी करीत आहेत.
भंडारातील बीटीबी सब्जी मंडी पाण्याखाली
भंडारा : संततधार पावसाने व धरणाच्या अनियमित पाण्याच्या विसर्गाने वैनगंगा नदीचे पात्र फुगून भंडारा शहरातील बीटीबी सब्जी मंडी पुराच्या पाण्यात बुडली. सुमारे ३० फूट पाणी बीटीबी मंडीच्या आवारात असून रस्त्यावर चाळीस फुट पाण्याचा प्रवाह वाहत आहे. या संकटकालीन पुरात बीटीबी सब्जी मंडीचे मोठे नुकसान झाले आहे.
गुरुवार, शुक्रवारी मुसळधार पावसाने जिल्हाभर हजेरी लावली. मात्र भंडारा जिल्ह्याच्या वर असलेले बावनथडी धरण, संजय सरोवर तसेच मध्य प्रदेशातील आणखी काही धरणाचे पाणी वैनगंगेलाला विसर्ग करण्यात आल्याने पुराचा धोका भंडारा वासियांना सहन करावा लागला. एवढा भयावह पूर अनुभवा लागेल याची यत्किंचितही जाणीव भंडारा वासियांना नव्हती. मात्र जिल्हा प्रशासनाने यात गांभीर्य न दाखविल्याने जनसामान्यासह बीटीबी सब्जी मंडीचे सुमार नुकसान झाले आहे. बीटीबी मंडित बंडू बारापात्रे यांचे भाजीपाल्यासह एक कोटींचे नुकसान झाले आहे. इतर व्यापाऱ्यांचे तीन ते चार कोटींचे नुकसान झाले आहे. टमाटर ठेवण्याचे हजारो कॅरेट, कांदा, टमाटर, पत्ता गोबी, आलू, अद्रक लसण, तसेच इलेक्ट्रिक साहित्यात कॅम्प्युटर, रोजचा आर्थिक व्यवहार लिहिणारे रजिस्टर, इलेक्ट्रिक साहित्य यासह शेतकºयांसाठी सेवेत असलेली कँटीनचे ७० लाखाच्या घरात नुकसान झाले आहे. चार पाच ट्रक, दोन कार बीटीबीमध्ये अडकून आहेत. फर्निचर पूर्णत: पाण्यात बुडलेला आहे.
सुकळीत गोदामातील धानाचे पोती पाण्यात
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील बपेरा जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत संलग्नीत गावांत नदी पात्रातील पुराचे पाणी शिरले. गावात असणाºया धानाचे गोदाम दोन दिवसांपासून पुराचे पाण्यात आहेत. त्यामुळे हजारो क्विंटल धानाचे नुकसान झाले आहे. सुकळी (नकुल) गावातील ग्गोदामामधील धानाच्या पोतींना मोठा फटका बसला आहे. बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील निम्म्याहून अधिक गावे वैनगंगा व बावनथडी नद्यांचे काठावर आहेत. या काठावरील गावात पुराचे पाण्याने दोन दिवसापासून थैमान घातले आहे. गावात आणि नागरिकांचे घरात पुराचे पाणी शिरले. यामुळे सुकळी (नकुल) गावात ५४ नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत विस्थापित करण्यात आले. गावाच्या सभोवताल पुराने वेढा घातल्यानंतर धानपिकाचे नुकसान झाले आहे. या गावात वैनगंगा नदी काठावरील माता बम्ब्लेश्वरी देवस्थानच्या सभागृहात धान खरेदी केंद्र अंतर्गत धानाचे पोती साठवणूक करण्यात आली आहेत. या सभागृहात उन्हाळी धान खरेदी करण्यात आले आहे. परंतु गत दोन दिवसापासून पुराचे पाण्यात वेढा घातल्याने हजारो क्विंटल धान ओलेचिंब झाले आहे. निर्धारीत कालावधीत पोती उचल करण्यात विलंब झाला असल्याने पुराचे पाण्याचा फटका बसला आहे. याच शिवारातील महालगाव व देवसर्रा गावात असणाºया गोडावून मधील धानाचे पोती पूर्णत: ओलेचिंब झाली आहेत. शासकीय व खासगी पोती या गोडावूनमध्ये होती. या सर्व धानाची नासाडी झाली आहे. या नुकसानग्रस्त धानाचे सर्वेक्षण झाले आहे.
नैसर्गिक आपदा असल्याने शासनाने याची दखल घेतली पाहिजे. धान खरेदी केंद्र संचालकांचा यात दोष नाही. यात प्रचंड नुकसान झाले असल्याने त्यांना सवलत देण्यात यावी. या गावात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांचे खाद्यान्न यात बुडाले आहेत. त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली नाही. यामुळे बेघर कुटुंब अडचणीत आले आहेत. महसूल विभागाने या नुकसानग्रस्तांचा तात्काळ सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्याची मागणी किशोर राहांगडाले यांनी केली आहे. या आशयाचे शासनाला निवेदन पाठविण्यात आले आहे.
गोंडीटोला येथे जलशुध्दीकरणाचा प्रश्न
सिहोरा : तुमसर तालुक्यातील गोंडीटोला येथे पुराचे पाणी शिरल्यानंतर पिण्याचे पाणी गढूळ आणि दूषित झाले आहे. यामुळे गावात आता आजाराची भीती निर्माण झाली आहे. आज सोमवारला पुराचे पाणी ओसरल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने विहिर, हातपंप व अन्य स्त्रोत शुद्ध करण्यात आले नाही. नद्यांचे पाणी गढूळ झाले आहे. हेच पाणी नागरिकांना थेट पुरवठा होत आहे. नळ योजनांना जलशुद्धीकरण नाही. यामुळे पाणी पिण्याशिवाय गत्यंतर नाही. पाणी पुरवठा योजने संदर्भात प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे. गावातील विहिरी, हातपंप तथा नदीवरील पंपगृहात जल शुद्धीकरणाचे प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती गोंडीटोल्याचे सरपंच देवेंद्र चिंचखेडे यांनी दिली.
खासदारांचा पूरग्रस्त गावात दौरा
कोंढा (कोसरा) : तालुक्यात संततधार पाऊस पडला. तसेच गोसे प्रकल्पाचे ३३ दरवाजे चार मीटरने उघडल्याने आलेल्या पुरामुळे अनेक गावे पुराच्या पाण्याने वेढली आहेत. या गावांना खासदार सुनिल मेंढे यांनी भेट देऊन तहसीलदारांना पुरग्रस्तांना तत्काळ मदत करण्याच्या सूचना दिल्या.
कुर्झा, इटगाव, सिंदपुरी, जुनोना, वलनी (चौ.), मांगली (चौ.), पौना, कोरंभी, कोदर्ली, गुडेगाव, रेवनी, विलम, खातखेडा, इसापूर, उमरी, शिमनाळा, येनोळा, वडेगाव, ब्रम्ही, भोजापूर या गावात वैनगंगा नदीचे पुराचे पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या पुराची माहिती खासदार सुनील मेंढे यांना मिळताच रविवारी कुर्झा, इटगाव व अनेक गावात जाऊन पूरग्रस्तांची भेट

Web Title: Life in the district is disrupted even after 48 hours due to floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.