१७ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:00 AM2020-07-13T05:00:00+5:302020-07-13T05:01:12+5:30
शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून चार जुलै ते सात जुलै दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यात कृषी विभागाने भरारी पथकांद्वारे कारवाईची मोहीम राबवली. विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, मिलींद लाड यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबवण्यात आली. शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठांचा पुरवठा करुन योग्य दरात विक्री करण्याचे आदेश कृषी निविष्ठा विक्रेत्यांना देण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खरीप हंगामात बळीराजाला जादा दराने खतांची विक्री करणाऱ्या तसेच तपासणी दरम्यान आढळलेल्या विविध त्रुटींच्या आधारे जिल्ह्यातील १७ कृषी केंद्रावर कृषी विभागाने निलंबनाची कारवाई केली. या कारवाईत रासायनिक खताचे १० परवाने , बियाण्याचे चार परवाने, कीटकनाशकांचे तीन परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून चार जुलै ते सात जुलै दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यात कृषी विभागाने भरारी पथकांद्वारे कारवाईची मोहीम राबवली. विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, मिलींद लाड यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबवण्यात आली. शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठांचा पुरवठा करुन योग्य दरात विक्री करण्याचे आदेश कृषी निविष्ठा विक्रेत्यांना देण्यात आले होते. मात्र तरीदेखील अनेक विक्रेत्यांनी आपल्या दुकानांसमोर दर्शनी भागात कृषी निविष्ठांचा दर फलक लावलेला दिसून आला नाही , नोंदणी प्रमाणपत्र ठळकपणे दिसेल असे न लावले नाही, तसेच पीओएस मशीनद्वारे खताची विक्री न करणे, रासायनिक खताची विक्री करताना शेतकऱ्यांना एमफॉर्मध्ये बिले न देता, विक्री केलेल्या रासायनिक खतांची बिले न ठेवणे, साठा रजिस्टर व गोडाऊनमधील प्रत्यक्षात उपलब्ध असलेला साठा व पोस्ट मशीन मधील साठा जुळून आला नाही. बिल बुकावर कंपनीचे नाव व लॉट नंबर लिहिले जात नसल्याच्या कारणांवरुन ही कारवाई करण्यात आली.
कारवाईत पवनी तालुक्यातील आठ कृषी केंद्रांवर, लाखनी तालुक्यातील दोन कृषी केंद्रावर, साकोली तालुक्यातील दोन, भंडारात एक, तर लाखांदूरात एक कारवाई करण्यात आली. कारवाईत रासायनिक खतांच्या बियाण्याचे कीटकनाशकाचे १७ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर रासायनिक खते नियंत्रण आदेशांतर्गत कारवाई केली.
कारवाईदरम्यान जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी विश्वजीत पाडवी, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, मोहिम अधिकारी विकास चौधरी, गुणनियंत्रण अधिकारी प्रदीप म्हसकर, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, आदित्य घोगरे, पद्माकर गिदमारे, सागर ढवळे, बालाजी शन्नेवाड, संजय लांजेवार सहभागी झाले होते. कृषी विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकाची कारवाई सुरूच असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग दक्ष असून शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदी करताना पक्की बिले घ्यावी. अधिक किमतीने खतांची कुणी विक्री करीत असल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांशी संपर्क साधावा.
- हिंदुराव चव्हाण,
जिल्हा कृषी अधीक्षक, भंडारा.