लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : रविवारी सायंकाळी विजेच्या कडकडासह दीड तास झालेल्या वादळी पावसाने करडी, निलज बुज, देव्हाडा परिसरातील शेतकऱ्यांचे कापणीला आलेले धानाचे पीक भुईसपाट झाले. शेतशिवारात झाडे कोलमडली. लोंबी पाण्यात भिजल्याने नुकसान झाले. याप्रकरणी चौकशी व पंचनाम्याला प्रारंभ झाला आहे. परिसरातील एकही शेतकरी नुकसानीच्या पचनाम्यापासून वंचित राहू नये, याची काळजी घेण्याचे आवाहन मोहाडी तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे यांनी निलज येथे केले.निलज (बुज) येथे नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करतेवेळी तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, कृषी पर्यवेक्षक राऊत, मुंढरीचे कृषी सहायक डी. एम. वाडिभस्मे, देव्हाडा, निलज बुज साझाचे तलाठी घोडेस्वार, पोलीस पाटील ताराचंद डोळस, निलज बुजचे सरपंच सुवर्णा गाढवे, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद गाढवे, उपसरपंच भाऊराव बुधे, सदस्य विजय मोटघरे व शेतकरी उपस्थित होते.धान पीक नुकसानप्रकरणी चौकशी व पंचनाम्यासाठी प्रशासनाच्या वतीने कृषी, महसूल व ग्रामपंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यांना आदेशित करण्यात आले आहे. ६ ऑक्टोबरपासून संयुक्त चौकशी व पंचनाम्याला प्रारंभ करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची चौकशी शेतकऱ्यांसमोर करावी. शेतकऱ्यांच्या शंकेचे समाधान करावे, असे निर्देशही तालुका अधिकारी शिवाजी मिसासे यांनी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी दिले. निदान यावर्षी तरी भरपाई मिळावी. मोहाडी तालुक्यात वादळी पावसाचा सर्वाधिक फटका निलज बुज, करडी व देव्हाडा परिसरातील शेतकऱ्यांना बसला.
गतवर्षी पालोरा महसुली मंडळ व करडी महसुली- मंडळातील बहूसंख्य शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. परंतु वैनगंगेला सप्टेंबर महिन्यात दोनदा आलेल्या पुरामुळे धान पिकाचे मोठे नुकसान झाले होते. जमीन खरडून पिके वाहून गेली होती. सडलेल्या व वाळलेल्या तणाची चौकशी व पंचनामे झाले. मात्र, पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. यावर्षी तरी नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य महादेव पचघरे, महादेव फुसे, संतोष शेंडे व शेतकरीवर्गाने केली आहे.