मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन : समर्थ महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटनलाखनी : ज्या व्यक्तीला ध्येय नाही तो चालत्या फिरत्या प्रेतासमान आहे. तो स्वत:करिता जगतो त्याच्या जगण्याला अर्थ नाही. तुम्ही किती वर्षे जगलात यापेक्षा तुम्ही कसे जगलात याला महत्व आहे. ध्येय म्हणजे डॉक्टर इंजिनिअर बनणे नव्हे तर समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणे, हे आपले ध्येय असले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.समर्थ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी समारोहाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खा.नाना पटोले होते. अतिथी म्हणून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, प्र-कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेवार, प्रभू देशपांडे, आ. राजेश काशिवार, आ. चरण वाघमारे, आ. अॅड. रामचंद्र अवसरे, आ. संजय पुराम, आ. नागो गाणार, आ. अनिल सोले, तारिक कुरैशी, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, कार्यवाह न.ता. फरांडे मंचावर होते.तत्पूर्वी त्यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. एन.सी.सी. उपक्रमांची मानवंदना स्वीकारली. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठगीत व राष्ट्र आराधनेने करण्यात आली. यावेळी ना. फडणवीस यांनी स्वामी विवेकानंदाचे मद्रास विद्यापीठातील भाषणाचा संदर्भ देऊन विद्यार्थ्यांना देशभक्तीचे धडे दिले. देशभक्त कोण तर सिमेवर लढणारा, राष्ट्रीय यज्ञात सहभागी होणारा हे खरे आहे. त्याही पलिकडे खरा देशभक्त कोण आहे, याचे तीन सोपान त्यांनी सांगितले. समाजाची विदारक समस्या बेकारी, अंधश्रद्धा, कुपोषण, भुखमरी बघून मन व्यथित मनाला वेदना होत असतील तर देशभक्तीचे पहिले सोपान आपण पार केले. अशी अवस्था बदलविण्याची जबाबदारी आपली आहे, असे विचार येणे हे दुसरे सोपान आहे. समाजातील दारिद्र्य, जातीव्यवस्था, विषमता बघुन मन द्रवित होत असेल आणि त्याकरीता कोणती योजना केली पाहिजे. आपल्या क्षमतेप्रमाणे काही ना काही काम केले पाहिजे, हे तिसरे सोपान असल्याचे त्यांनी सांगितले. स्वराज्य मिळाले सुराज्य, सुशासन निर्माण करणे महत्वाचे आहे. जनतेच्या भरवशावर सुराज्य निर्माण होते. योग्य समाजव्यवस्था व राज्यव्यवस्था सुराज्याकडे घेऊन जात असते. समाजाने व्यवस्था निर्माण केली. व्यवस्थेमुळे शिक्षण मिळाले, रोजगार मिळाले. आपण घेतच राहतो देत काहीच नाही, यामुळे संधी मिळेल तेवढे समाजासाठी देण्याची भावना रुजली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी खा. पटोले म्हणाले, भंडारा जिल्ह्यात शैक्षणिक हब व्हावे, अशी मागणी केली. धान उत्पादक शेतकऱ्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी वैद्यकीय महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय आवश्यक आहे. कौशल्यपूर्ण शिक्षणाची गरज असून देशात दरवर्षी पाच लाख इंजिनिअर तयार होतात. त्यातील २५ हजारांना नोकरी मिळते. त्यामुळे रोजगाराभिमुख शिक्षण महत्वाचे आहे. समर्थ महाविद्यालयाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शाल-श्रीफळ, मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. संजय पोहरकर यांच्या धरणीकंप या कवितासंग्रहाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर यांनी बापूसाहेब लाखनीकर जन्मशताब्दी सोहळा साजरा केला जाणार असल्याचे सांगितले. समर्थ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी गोपीचंद नवखरे यांनी १९७५ च्या आणीबाणीमध्ये सत्याग्रही म्हणून सहभागी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय पोहरकर यांनी केले. आभारप्रदर्शन उपप्राचार्य राम आर्विकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
सकारात्मक बदल घडविण्याचे ध्येय बाळगा
By admin | Updated: January 7, 2015 22:46 IST