राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणअंतर्गत खासगी कंत्राटदाराद्वारे राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व गावांतर्गत सांडपाणी वाहून जाण्यासाठी, नाल्या तयार करण्यात आल्या. मात्र ठाणा राष्ट्रीय महामार्ग सोनामातानगर ते जुना ठाणा राष्ट्रीय महामार्गापर्यंत गावांतर्गत रहदारी रस्ता बांधण्यात आलेला नाही. नाल्यांचे बांधकाम अर्धवट राहिले. परिणामी दरवर्षी रस्त्यावरील पावसाचे सांडपाणी गावांमधून वाहून जाते. यामुळे खासगी विहिरी, हातपंपामध्ये दूषित पाण्याचा शिरकाव होतो. गावातील रस्ते, पाण्याच्या जलद प्रवाहाने रस्त्यावर खड्डे पडतात. त्याचा परिणाम नागरिकांना प्रवास करणे कठीण होते. ठाणा जवाहरनगर टी पाॅईंट ते नागपूर बसस्थानकसमोर, ठाणा गॅस एजन्सी ते आयुध निर्माणी पतसंस्थेचे पेट्रोल पंपादरम्यान अर्धवट नाल्या बांधकाम केल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा दोन ते तीन फूट खोल नाल्यामध्ये घनकचरा साचला आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्यातील घनकचरा काढण्याची मागणी ठाणा येथील नागरिक बाळू पडोळे, विशू पिंपळशेंडे, निखिल तिजारे, माजी सरपंच शिवदास उरकुडे, आरती मेश्राम यांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्गालगत नाल्या अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST