पवनी : २७ वर्षापूर्वी मागासलेल्या पुर्व विदर्भाला सुजलाम सुफलाम करण्याकरिता गोसेखुर्द येथे वैनगंगा नदीवर गोसीखुर्द धरण तयार करण्याकरिता माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या हस्ते लाखो जनतेच्या उपस्थित भूमिपूजन करण्यात आले. पण, या भूमिपूजन स्थळाची पुर्णत: दुर्दशा झाली आहे. धरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे या भूमिपूजन स्थळाची उपेक्षा होत आहे.हरीतक्रांती आणण्याची क्षमता असणाऱ्या गोसीखुर्द धरणाचे भुमिपूजन २२ एप्रिल १९८८ ला करण्यात आले. या धरणाच्या कामावर आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे धरण अनेक कंत्राटदारांसाठी एक प्रकारे लॉटरीच ठरली आहे. या धरणाच्या राजीव गांधी टेकडीवरील भूमिपूजन स्थळाची पुर्णत: दुर्दशा झाली आहे. या भूमिपूजन स्थळाच्या कोनशिलेवर लावलेल्या टाईल्स निघून खाली पडलेल्या आहेत. कोनशिलेवरील लिहिण्यात आलेली नावे पुर्णत: मिटलेले आहेत. त्यामुळे दररोज येणाऱ्या शेकडो पर्यटकांना धरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे नावे किंवा धरणाच्या विस्ताराची माहिती होऊ शकत नाही. कोनशिलेवरील माहिती प्राप्त झाल्यास पर्यटकांना ती विद्यार्जनात काही येऊ शकते. इतके दिवस होवून या भूमिपूजन स्थळाची दुर्दशा झाली असतानाही धरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)
गोसेखुर्द धरण भूमिपूजनस्थळाची दुर्दशा
By admin | Updated: April 29, 2015 00:39 IST