अडीच महिन्यापासून शेतकऱ्यांचे धान उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 06:00 AM2020-02-26T06:00:00+5:302020-02-26T06:00:42+5:30
मोहाडी तालुक्यातील ताडगाव येथे १३ गावांसाठी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. परिसरातील शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर धानाचे पोते नेले. परंतु गत अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडून आहेत. दररोज शेतकरी आधारभूत केंद्रावर जाऊन आपल्या धानाची मोजणी कधी होईल याची विचारणा करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
जांब (लोहारा) : घाम गाळून पिकविलेला धान शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्रावर विक्रीस नेला. मात्र गत अडीच महिन्यांपासून या धानाची खरेदी झाली नाही. शेतकऱ्यांचा धान उघड्यावर पडून असून अवकाळी पावसाने गारपीटीने धानाचे नुकसान होण्याची भीती आहे. मोहाडी तालुक्यातील ताडगाव खरेदी केंद्रावरील या प्रकाराने शेतकरी संतप्त झाले असून आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
मोहाडी तालुक्यातील ताडगाव येथे १३ गावांसाठी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. परिसरातील शेतकºयांनी खरेदी केंद्रावर धानाचे पोते नेले. परंतु गत अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडून आहेत. दररोज शेतकरी आधारभूत केंद्रावर जाऊन आपल्या धानाची मोजणी कधी होईल याची विचारणा करतात. परंतु कुणीही योग्य उत्तर देत नाही. पावसापासून सुरक्षेसाठी अनेक शेतकऱ्यांनी धानपोत्यावर ताडपत्री झाकली होती. परंतु ती सुद्धा चोरीस गेल्याचे अनेक शेतकरी सांगतात. आता ताडगाव व्यतिरिक्त लोहारा, सोरणा ही गावे बाजारसमितीने जांब व चिचोली केंद्राला जोडल्याचे सांगत आहे. दुसरीकडे ताडगाव केंद्रावरील मोजणी बंद आहे. या सर्व प्रकाराने शेतकरी संकटात सापडले आहेत. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु कुणीही दखल घेतली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ताडगाव केंद्रावर धानाची खरेदी त्वरीत सुरु करावी अशी मागणी आहे. मोजणी न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गत दोन महिन्यांपासून माझ्यासह अनेक शेतकऱ्यांचा धान केंद्राबाहेर उघड्यावर पडून आहे. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना झाल्या नाही. धान मोजला नाही तर चुकारे कसे मिळणार. यावर तात्काळ उपाययोजना करावी.
-राजेश दोनाडकर, शेतकरी.
अवकाळी पावसाची भीती
ताडगावसह मोहाडी तालुक्यातील अनेक केंद्रावर आजही धान उघड्यावर आहे. सोमवारपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. उघड्यावरील धान ओला होण्याची शक्यता आहे. परंतु याकडे कुणीही लक्ष देत नाही.