जिल्ह्यातील चालक वाहक म्हणतात, मुंबईची ड्यूटी नको रे बाबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST2021-04-03T04:31:28+5:302021-04-03T04:31:28+5:30
भंडारा : राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुंबई येथील बेस्ट सेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या ...

जिल्ह्यातील चालक वाहक म्हणतात, मुंबईची ड्यूटी नको रे बाबा
भंडारा : राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुंबई येथील बेस्ट सेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या विविध विभागातील राज्यातील चालक-वाहकांना मुंबई बेस्ट सेवेसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र भंडारा जिल्ह्यातील चालक-वाहकातून मुंबईची ड्यूटी नको रे बाबा असे म्हणत अनेक जण नकार देत आहेत.
सुदैवाने भंडारा विभाग नियंत्रक कार्यालयातील एकाही चालक, वाहकाची गतवर्षी मुंबई येथील बेस्ट बस सेवेसाठी ड्यूटी लागली नव्हती. राज्यातील इतर महामंडळाच्या विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर, धुळे, नांदेड, लातूर, जालना तसेच विदर्भातील अमरावती, अकोला इतर जिल्ह्यातील अनेक चालक वाहकांची मुंबई बेस्ट सेवेसाठी ड्यूटी लागली होती. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने मुंबई कार्यालयातून चालक-वाहकांना मुंबईला पाठविण्याचे आदेश निघणार असल्याची माहिती आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक चालक-वाहकांनी या बेस्ट बस सेवेबद्दल चिंता व्यक्त केली असून अनेक जण नापसंती दर्शवत आहेत. अजून प्रत्यक्षात विभागीय कार्यालय, भंडाराला आदेश प्राप्त झालेले नाहीत. मात्र हे आदेश लवकरच मिळणार असल्याची माहिती आहे.
कोट
मुंबईला कर्तव्यासाठी गेल्यावर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला कोरोना संसर्गाची लागण होऊ शकते, यामुळे अनेकजण मुंबई ड्यूटी नको रे बाबा असे म्हणू लागले आहेत.
गतवर्षी कोरोना काळात इतर राज्यातील मजुरांना सोडण्याचे कर्तव्य निभावले. सुदैवाने मुंबईला जावे लागले नाही. मात्र आता वय वाढत चालल्याने कोरोना संसर्गाची भीती वाटत आहे. ५० व यापुढील कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठवू नये.
चालक.
कोट
इकडे सरकार मुंबईला कर्तव्यासाठी बोलावत आहे. पण दुसरीकडे त्याच चालक-वाहकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांची जबाबदारी एसटी किंवा शासन घेत नाही. शिवाय कुटुंबीयांना नुकसान भरपाईही मिळत नसल्याने शासनाने चालक वाहकांचा विचार करावा.
वाहक
सुदैवाने जिल्ह्यातील एकाचीही मुंबईला ड्यूटी लागलीच नाही
गतवर्षी लॉकडाऊन नंतर जिल्ह्यातील अनेक चालक, वाहकांनी स्थलांतरित परराज्यातील मजुरांना सोडण्यासाठी कर्तव्य निभावले होते. यावेळी त्यांना पिण्याच्या पाण्यापासून घरी पोहचेपर्यंत अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. मात्र सुदैवाने जिल्ह्यातील एकाही चालक, वाहकाचा मुंबई येथील बेस्ट सेवेसाठी कर्तव्य निभावण्यासाठी जावेच लागले नसल्याने कर्मचारी निश्चिंत होते. मात्र, आता पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडून विविध विभागातील चालक वाहकांची नावे मागविण्यात येत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चिंता सतावू लागली आहे.