पवनी : बस्तरवारी वाॅर्ड पवनी येथील रमाई बुद्धविहारलगत घराचे बांधकाम करणाऱ्या इसमाने बुद्धविहाराचे सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केले तसेच रमाई बुद्धविहाराचे खिडक्यावरील सज्जे तोडून भिंतीलगत घराचे बांधकाम सुरू केले. यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे वाॅर्ड आतील नागरिकांनी तक्रार दाखल केली. गत पाच महिन्यांपासून पालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. नाईलाजाने नागरिकांनी जिल्हाधिकारी भंडारा यांचे कार्यालयात तक्रार दाखल करुन कार्यवाहीची मागणी केली आहे.
पवनीनगरात घर बांधकाम करण्यास सहजरितीने बांधकाम परवानगी दिली जात नाही. त्यामुळे विनापरवानगीने घराचे बांधकाम करण्याचे नागरिकांनी सुरू केले आहे. तसेच परवानगी न घेता बांधकाम करीत असल्याने नियमाची पायमल्ली व रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. त्याचाच फायदा घेऊन बस्तरवारी वाॅर्डातील प्रेमनाथ अंबादे यांनी सार्वजनिक सभामंडपाचे सज्जाची तोडफोड व रस्त्यावरदेखील अतिक्रमण केले आहे, अशी तक्रार वाॅर्डातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. वाॅर्डातील नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.