मोहन भोयर तुमसर : तालुक्याची जीवनदायिनी व भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील प्रमुख नदी म्हणून ओळखली जाणाऱ्या वैनगंगा नदी सध्या गंभीर संकटातून जात आहे. तुमसर तालुक्यात अनेक ठिकाणी नदीच्या काठांचे मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत असल्याने शेकडो हेक्टर सुपीक जमीन नदीपात्रात समाविष्ट होत आहे. बेसुमार रेती उत्खननामुळे नदीपात्रात दगड व माती दिसत आहे. यामुळे अनेक ठिकाणी नदीचे पात्रच आता उथल बनले आहे.
काही ठिकाणी जलप्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत. एकीकडे गंगा शुद्धीकरणावर कोट्यवधींचा खर्च होताना दिसत असला तरी, आमची वैनगंगा मात्र दुर्लक्षितच असल्याची खंत आहे. एकीकडे केंद्र सरकार गंगा नदीच्या शुद्धीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना वैनगंगेसारख्या इतर महत्त्वाच्या नद्यांकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. यासाठी आता 'वैनगंगा बचाव' मोहीम हाती घेऊन पुढे येण्याची गरज आहे. बेसुमार रेती उत्खननामुळे दरवर्षी नदीकाठाचे भूस्खलन होत आहे. परिणामतः अनेक गावांना दरवर्षी पुराचा धोका वाढला आहे. शेकडो हेक्टर शेती नदीपात्रात समाविष्ट होत आहे असतानाही लोकप्रतिनिधींचे कायम दुर्लक्ष आहे.
शासनाचे दुहेरी मापदंड का?केंद्र सरकारने नमामि गंगे प्रकल्पांतर्गत गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत. वैनगंगेसारख्या मोठ्या व जनजीवनाशी संबंधित नदीकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. वैनगंगा नदी विदर्भातील लाखो लोकांसाठी पेयजल आणि आणि सिंचनाचे महत्त्वाची स्त्रोत आहे. तरीही वैनगंगेच्या संवर्धनासाठी कुमणी पुढे येऊ नये, ही मोठी शोकांतिका आहे.
तातडीच्या उपायोजना कराल, तरच फायदावैनगंगा नदीला या गंभीर संकटातून वाचविण्यासाठी तातडीच्या उपाययोजनेची गरज आहे. यात भूस्खलन झालेल्या परिसरात सुरक्षा भिंती बांधणे, काठावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे, नदीपात्रातील गाळ काढणे, नदीचे खोलीकरण खर्चीक बाब असल्याने यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, 'वैनगंगा बचाव अभियान'सारखा प्रकल्प हाती घेतला जावा. अपरिमित वाळूचा उपसा मर्यादित केला जावा. अनेक दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीव यांचा अधिवास धोक्यात आला आहे.
भूस्खलनाची भीषणतातुमसर तालुक्यातील बपेरा, मांडवी, रेंगेपार, उमरवाडा, बोरी, कोष्टी, बाम्हणी, माडगी, चारगाव, ढोरवाडा, सुकळी, रोहा यांसारख्या अनेक गावाजवळ वैनगंगा नदीच्या काठांवर मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले आहे. विशेषतः पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर काठांची धूप मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे भूस्खलनाची समस्या अधिक गंभीर बनते. काठावरील झाडे, माती आणि दगड नदीपात्रात कोसळल्याने नदीची परिणामतः उथळ पाणी इतरत्र पसरून थेट गावांपर्यंत पोहचत आहे. भूस्खलनामुळे नदीचे संतुलन बिघडले आहे. नदीकाठावरची जैव विविधता धोक्यात आली आहे.