भंडारा : अकाली पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे विविध आजार बळावले असून रुग्णसंख्येत वाढ झाली आहेत. शहरातील रुग्णालय, दवाखाण्यांमध्ये रुग्णांर्ची गर्दी दिसून आली. भंडारा जिल्ह्यात १५ दिवसांपुर्वी वातावरण कोरडे होते. त्यानंतर आठवडाभरापुर्वी गुलाबी थंडीची चाहूल सुरुझाली.तीन दिवसांपासून पारा कमालिचा घसरला असल्याने नागरिकांना बोचऱ्या थंडीचा सामाना करावा लागला. वातावरणाच्या बदलामुळे रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. थंडीचा वाढता प्रभाव बालक व वृद्धासाठी जीवघेणाही ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते, या बोचऱ्या थंडीमुळे बालक व वृद्धांच्या श्वासनलिका आकुंचन पावतात. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच बाल दमा, व्हिंटस डायरिया, त्वचेवर खाज, कावीळ व न्युमोनिया सारखे आजारही बळकावू शकतात. अस्थमाच्या रुग्णांना अटॅक सुद्धा येऊ शकतो. विशेषत: वयोवृद्धांमध्ये प्रतिकार क्षमता कमी असते. त्यामुळे थंडीचा अधिक प्रभाव जाणवू शकतो. अशा स्थितीत वृद्ध दगावू सुद्धा शकतात. त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. (नगर प्रतिनिधी)
वातावरण बदलामुळे आजार बळावले
By admin | Updated: January 8, 2015 22:49 IST