जिल्ह्यातील शेतशिवारात पीक काढण्याची लगबग, पण मजुरांची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST2021-04-03T04:31:30+5:302021-04-03T04:31:30+5:30
अनेक शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतात करीत आहेत. मात्र, ढगाळ वातावरण, तसेच वन्य प्राण्यांचा असलेला त्रास यामुळे मळणी ...

जिल्ह्यातील शेतशिवारात पीक काढण्याची लगबग, पण मजुरांची टंचाई
अनेक शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतात करीत आहेत. मात्र, ढगाळ वातावरण, तसेच वन्य प्राण्यांचा असलेला त्रास यामुळे मळणी यंत्रांना मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी मजुरांना जादा पैसे देऊन लवकर पिकांची कापणी करीत आहेत. काही गावांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मजूर कोरोनाच्या भीतीने कामास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे एकीकडे मजूर मिळतात, तर दुसरीकडे मळणीसाठी मशीन मिळत नाही. मशीन मिळालीच तर मजूर उपलब्ध होत नाहीत. अशी दुहेरी समस्या शेतकऱ्यांना सतावत आहे. भंडारा तालुक्यातील चिखली, खरबी, खराडी, माटोरा, मानेगाव बाजार खुटसावरी, शहापूर, नांदोरा परिसरात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रबी हंगामातील गहू, हरभरा पिकाचे चांगले उत्पादन येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यासोबतच खरीप हंगामात शेतकऱ्यांना बसलेला फटका यामुळे आणि रबी हंगामातील पिकांवरच पूर्ण लक्ष केंद्रित केले होते. कोरोना संसर्ग तर दुसरीकडे वाढत्या महागाईने शेतकरी संकटात सापडला आहे.
डिझेलच्या वाढत्या दराने शेतकरी त्रस्त एकीकडे दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे, तर दुसरीकडे वाढलेल्या डिझेल पेट्रोलच्या किमतीचा परिणाम शेतकऱ्यांना मदनी पिकाच्या कापणीसाठी अधिकचा दर मोजावा लागत आहे. प्रत्येक पोत्यामागे शेतकऱ्यांना गेल्या वर्षीपेक्षा अधिकचा दर द्यावा लागत आहे. इंधन दरवाढीचा फटका सर्वांनाच सोसावा लागत आहे. यंदा डिझेलच्या दरवाढीने आणि शेतमजूरही जास्तीचे पैसे मागत आहेत त्यामुळे वाढत्या महागाईचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
कोट
रबी हंगामातील पिकांचे उत्पन्न शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा चांगले होत आहे. मात्र, यावर्षी डिझेलचे दरही वाढले आहेत. त्यामुळे पोत्यामागे पन्नास ते शंभर रुपयांची दरवाढ झाली आहे. वाढत्या महागाईची झळ शेतकऱ्यांसह मळणी यंत्र मालकांनाही बसत आहे.
श्रीकांत वंजारी
परसोडी, ता.भंडारा, मळणीयंत्र मालक.
कोट
प्रत्येक गोष्टीतच महागाई वाढली आहे. मात्र, राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, अतिवृष्टी मदत, तसेच पीक कर्जमाफी अजूनही दिली नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे. डिझेलचे दर वाढले आहेत. मात्र, त्या तुलनेत शेतमालाला भाव मिळत नाही.
विष्णुदास हटवार
शेतकरी तथा तंटामुक्ती अध्यक्ष, चिखली.