मोहाडी : समाजातील प्रत्येक घटकाला शासनाने प्रगती व विकास करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. समाजातील वर्गानुसार व जातीनुसार आरक्षण उपलब्ध करून दिले आहे. परंतु समाजातील आदिम घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वतंत्र्य लढयात महत्वाचे स्थान असणाऱ्या गोवारी समाजाच्या वाट्याला स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही नेहमी उपेक्षा आली आहे.गोवारी समाजाचा मुख्य व्यवसाय गोपालन व शेळीपालन करण्याचा आहे. २१ व्या शतकात गोवारी समाजाच्या वाट्याला दुर्दैव आले आहे. गोवारी समाजात अनेक गरीब उपजातींचा समावेश आहे. तरीही त्यांच्या वाट्याला फक्त २ टक्के आरक्षण, त्यामुळे या समाजाच्या प्रगतीच्या वाटा खुंटल्या आहेत. आपल्याला आपले हक्क मिळावे यासाठी शांततेच्या मार्गाने २३ नोव्हेंबर १९९४ रोजी महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला होता. या ठिकाणी लहान मुलांपासून तर वृद्ध पडक्यात भाकरी बांधून जमले होते. दिवसभर अनेक मंत्र्यांना विनवन्या करूनही एकही मंत्री मोर्चाला सामोरे न आल्याने नेत्यांच्या निराशेतून जमाव हिरमुसला. याचवेळी मोर्चातील उपस्थितामध्ये चलबिचल सुरू झाल्याचे हेरून नेतृत्वहीन समाजावर पोलिसांनी अंधाधुंद लाठीमार केला. लहानांपासून, तरूण वृद्धापर्यंत सर्वाच्या चेहऱ्यावर स्वाभिमान व हक्काचे तेज दिसत असताना रक्तरंजीत परिस्थिती निर्माण झाली. गोवारींच्या समस्येवर तोडगा न काढता पोलिसांनी लाठीमार केला. त्यात धावाधाव होवून रक्तामासाचा सडा पडला. आई, बाबा, काका, मामा असा आवाज करून जो तो पळू लागला. त्यात लहान बालकेही पायााखाली चिरडली गेली. त्यात अनेक घरे बेघर झाली, तर मुले पोरकी झाली. आई-वडिल मुलांसाठी अश्रुच्या सागरात बुडाली. त्या काळ्या दिवशी ११४ गोवारी बांधवाची निर्घृण हत्या झाली. शासनाने गोवारींचा आवाज दडपण्यासाठी आर्थिक भरपाई दिली व सीताबर्डीवडील उड्डाण पुलाला गोवारी उड्डाण पुल असे नाव दिले. पण त्यांना अधिकार दिले नाहीत. गोवारी हत्याकांड होवून आज २० वर्षे झाली. आदिवासीत्व बहाल करण्याची एकमेव मागणी जागच्या जागी, जशीच्या तशीच अडगळीत पडून आहे. त्यामुळे विकासाअभावी एक पिढी बर्बाद झाली आहे. अजून किती पिढ्यांच्या बर्बादाची वाट पाहणार आहेत, की कायमच अंगावर अंधार पांघरून ११४ गोवारींचे बलिदान वाया घालविणार याचा गांभीर्यपूर्वीक विचार करण्याची वेळ आली आहे. गोवारी जमात मुळातच नागरी संस्कृतीपासून कोसो मैल दूर आहे.हत्याकांडानंतर समाजाला संघटीत करून त्यांच्यात जनजागृती करणे, आपल्या अधिकाराच्या लढाईत शहीद झालेल्या लोकांच्या संदर्भात समाजाला जागृत करणे गरजेचे होते, परंतु समाजातील नेत्यांच्या असंघटीतपणामुळे एकता प्रस्थापित होण्यास आडकाठी निर्माण होत आहे. गारूड्याने डमरू वाजविताच साप-मुंगुसाची लढाई पाहण्यासाठी लहान मुले सभोवताल गोळा होतात, तसा प्रकार सुरू आहे. त्यामुळे समाजातील लोकांना न्याय मिळत नाही. हा समाज अद्यापही हालअपेष्टांच्या गर्तेत सापडला आहे. त्यातून बाहेर काढणारा लोकप्रतिनिधी मिळालेला नाही ही खरी शोकांतिका आहे.(शहर प्रतिनिधी)
स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही गोवारी समाज अधांतरी
By admin | Updated: November 27, 2014 23:29 IST