३,३६२ कृषीपंपांना मिळालाय ‘करंट’ : हंगामाची चिंता, पैसे भरूनही जोडणीसाठी होतोय विलंबदेवानंद नंदेश्वर । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असले तरी भंडारा जिल्ह्यातील १,८१० शेतकरी कृषीपंप वीज जोडणीपासून वंचित आहेत़ याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.प्रलंबितसह ३ हजार कृषीपंपाची वीज जोडणी यावर्षीच्या सत्रात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट वीज वितरण कंपनीला दिलेले आहे. भंडारा जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका सहन करावा लागत आहे़ कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी पूर्णत: खचलेला आहे़ शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या सहायाने शेती करण्यासाठी विशेष योजना आखली़ कृषीपंपाच्या सहायाने खरीपासह रबी पिकांची लागवड करुन जीवनमान उंचवावे, अशी शासनाची अपेक्षा आहे़ परंतु भंडारा जिल्ह्यात मार्चअखेरपर्यंत १,८१० शेतकऱ्यांनी रक्कम भरुनही कृषीपंपाचे विद्युतीकरण झालेले नाही. यामध्ये भंडारा तालुक्यात ११०, मोहाडी तालुक्यात ३१८, तुमसर तालुक्यात ९३, पवनी तालुक्यात २५६, साकोली तालुक्यात ४८५, लाखनी तालुक्यात ३८५ तर लाखांदूर तालुक्यात १६३ शेतकऱ्यांचा समावेश आहे ़ वीज वितरण कंपनीकडून देण्यात येणारी कृषीपंप वीजजोडणी दि़३१ मार्च २०१६ अखेर १,६७५ इतकी प्रलंबित होती़ २०१६-१७ या वर्षात ३,४९७ कृषीपंप वीज जोडणीचे अर्ज प्राप्त झाले़ ३१ मार्च २०१६ पर्यत एकुण ५,१७२ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २०१६-१७ मध्ये भंडारा जिल्ह्यात ३,३६२ वीज जोडणी करण्यात आली़ यात भंडारा तालुक्यात ३७४, मोहाडी तालुक्यात ४२३, तुमसर तालुक्यात २४८, पवनी तालुक्यात ४६८, साकोली तालुक्यात ६५२, लाखनी तालुक्यात ८१४ तर लाखांदूर तालुक्यात ३८३ वीज जोडणीचा समावेश आहे़ ३१ मार्च २०१६ अखेर १,६७५ कृषीपंपाची वीज जोडणी प्रलंबित होती़ यामध्ये भंडारा तालुक्यात १३२, मोहाडी तालुक्यात २१९, तुमसर तालुक्यात ६२, पवनी तालुक्यात २५६, साकोली तालुक्यात ४०४, लाखनी तालुक्यात ४३५ तर लाखांदूर तालुक्यात १६६ वीज जोडणींचा समावेश होता़ सन २०१६-१७ यावर्षात ३,४९७ अर्ज वीज वितरण कंपनीकडे प्राप्त झाले़ यामध्ये भंडारा तालुक्यात ३५२, मोहाडी तालुक्यात ५२२, तुमसर तालुक्यात २७८, पवनी तालुक्यात ४६८, साकोली तालुक्यात ७३३, लाखनी तालुक्यात ७६४ तर लाखांदूर तालुक्यात ३८० अर्ज वीज जोडणीसाठी प्राप्त झाले होते़ मागील वर्षीचे प्रलंबित यासह ३ हजार वीज जोडणी सन २०१७-१८ वर्षात पूर्ण करण्याचा लक्षांक आहे़ ही वीजजोडणी दोन टप्प्यात दिली जाणार आहे. खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात उत्पादन घेता यावे म्हणून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी विविध योजनांतर्गत शेतात विहिरी व बोअरवेल केल्या आहेत. वीज पुरवठ्यासाठी वितरणकडे रीतसर अर्ज केले. त्यासाठी आवश्यक त्या रकमेचा भरणाही केला. मार्च २०१७ अखेरपर्यत जिल्ह्यातील १,८१० शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. यामुळे विहीर व पाणी असतानाही सिंचन करणे अशक्य झाले. शासनाने विविध योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात सिंचन विहिरी खोदून देण्याची योजना आखली. या योजनांचा लाभ घेत हजारो शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीसाठी अर्ज केले. त्यानुसार विहिरी मंजूर झाल्या. खोदकाम, बांधकाम पार पडले. याला एक ते अडीच वर्षांचा कालावधी लोटला; पण त्या विहिरी शेतकऱ्यांच्या उपयोगी पडल्या नाहीत. विहिरी पूर्ण झाल्यानंतर वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी विद्युत कंपनीकडे अर्ज केले. अनामत रक्कम भरल्यातर वीज पुरवठा होईल, अशी अपेक्षा असताना शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळालेली नाही, हे वास्तव आहे. १२७ शेतकऱ्यांकडे सौर उर्जा कृषिपंपउर्जेेचा स्त्रोत नसणाऱ्या किंवा वनकायद्यासह इतर अडचणींमुळे वीज जोडणीपासून वंचित राहणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली. भंडारा जिल्ह्यात १९५ सौर उर्जा कृषीपंप लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. १५० शेतकऱ्यांनी रक्कमेचा भरणा केला. त्यापैकी १२७ शेतकऱ्यांच्या शेतात सौर उर्जा कृषीपंप लावण्यात आलेले आहेत. उर्वरीत शेतकऱ्यांना लवकरच त्याचा लाभ मिळणार असल्याचे विज वितरण कंपनीकडून सांगण्यात आले.२०१६-१७ मध्ये भंडारा जिल्ह्यात ३,३६२ वीजजोडणी करण्यात आलेली आहे.प्रलंबित काही कामे प्रगतीपथावर आहेत. ३ हजार कृषीपंपाची जोडणी यावर्षीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी काही प्रमाणात कृषीपंपांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषीपंपाचा लाभ घेता येईल.- अनिल गेडाम, कार्यकारी अभियंता (प्रशासन), वीज वितरण कंपनी, भंडारा
१,८१० कृषिपंप वीज जोडणीपासून वंचित
By admin | Updated: May 8, 2017 00:19 IST