उदासिनता कारणीभूत : निर्मलग्राम योजनेचा बोजवारासंजय साठवणे - साकोलीदेशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत निर्मल भारत करण्यासाठी गावागावात वैयक्तीक शौचालये बांधण्याची योजना राबविण्यात येत आहे. मात्र साकोली तालुक्यातील १४ हजार ५७४ कुटुंबाजवळ शौचालय नाहीत. त्यामुळे स्वच्छ भारत मिशनचे उद्दीष्ट आणि निर्मलग्राम योजना साकोली तालुक्यात यशस्वी होण्याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या साकोली तालुक्यात ९६ गावे असून ६४ ग्रामपंचायती आहेत. या तालुक्याची लोकसंख्या दोन लाखाच्यावर आहे. मात्र योजनांची अपूर्ण माहिती व अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्याचा कामचुकारपणा यामुळे साकोली तालुक्यातील १४ हजार ५७४ कुटूंबे आजही शौचालयापासून वंचित आहेत. त्यामुळे या कुटुंबातील लोकांना गावाशेजारी उघड्या जागेवर शौचास बसावे लागते. त्यामुळे गावात रोगराई पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी स्वच्छ भारत अभियानाला गालबोट लागले आहे. ग्रामीण नागरिकांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी उघड्यावर शौचास बसण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. या योजनेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी विविध नियम व कायदे लागू करण्यात आले आहेत. २००३ ते २०१३ पर्यंत स्वच्छता अभियानातून हागणदारी मुक्त गावांची संकल्पना शासनाने मांडली होती. २०१३-१४ मध्ये ही योजना निर्मल भारत अभियान राबविण्यात आली. ग्रामीण भागातील अस्वच्छता दूर करण्यासाठी शौचालयाची योजना राबविण्यात येत असली तरी जनतेकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. शौचालयासाठी राज्य शासनाकडून १० हजार रूपये अनुदान दिले जात होते. यात निर्मल भारत योजनेतून ४,३०० रूपये आणि नरेगातून ५,४०० रूपये दिले जात होते. मात्र वाढती महागाई लक्षात घेता नरेगाला वगळून अनुदानात दोन हजार रूपयाची भर घालण्यात आली आहे. त्यामुळे हे अनुदान आता १२ हजार रूपयांवर पोहोचले आहे. ही संपूर्ण रक्कम एकाचवेळी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते. या अनुदानातून शौचालयासह पाण्याची सोय करण्यांची जबाबदारी लाभार्थ्यांची आहे.
१४,५७४ कुटुंबे शौचालयापासून वंचित
By admin | Updated: January 12, 2015 22:44 IST