लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अनियंत्रीत वेगाने वाहन चालविणे आणि नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्ह्यात दहा महिन्यात २४३ अपघातांची नोंद झाली असून त्यात ११७ जणांना आपला जीव गमवावा लागला तर २२३ जण गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे कोरोना लाॅकडाऊननंतर जिल्ह्यात अपघातांची संख्या घटली असुन एप्रिल महिन्यात तर केवळ ९ अपघातांची नोंद झाली होती.भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह इतर राज्यमार्गावर दररोज कुठे ना कुठे अपघाताची नोंद होते. जिल्ह्यात सर्वाधिक अपघात दुचाकीचे असल्याचे दिसून येते. बहुतांश अपघात समोरील वाहनांना ओव्हरटेक करताना झाल्याचे दिसून येते. नियमांचे पालन न करता अनियंत्रीत वेगाने वाहन चालविणेही अपघाताचे मुख्य कारण आहे. दुचाकीच्या अपघातात हेल्मेट नसणे आणि मोबाईलवर बोलणे हे मुख्य कारण आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात जिल्ह्यात २४३ अपघाताची नोंद झाली. त्यात तब्बल १२० अपघात दुचाकीचे आहेत. या अपघातात ११७ व्यक्तींचा बळी गेला. तर २२३ व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. जिल्हा पोलीस दलासह वाहतूक शाखेच्या वतीने अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अपघात प्रवण स्थळांची ओळख पटुन ब्लॅकस्पाॅट तयार करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ३६ ब्लॅकस्पाॅट असून या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. वर्दळीच्या ठिकाणी आणि शाळा महाविद्यालयांसमोर गतीरोधकांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र यानंतरही नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे प्रामुख्याने अपघात होतात. मद्य प्राशन करुन वाहन चालविल्याने अपघाताचे प्रमाणही मोठे आहे. जिल्ह्यात जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यात ७१ अपघातांची नोंद झाली आहे. मात्र मार्च महिन्यापासून कोरोना संसर्ग वाढायला लागला. एप्रिल महिन्यापासून लाॅकडाऊन सुरु झाले. तेव्हापासुन अपघातांची संख्या घटल्याचे दिसते. एप्रिल महिन्यात तर संपुर्ण लाॅकडाऊन होते. या महिन्यात केवळ नऊ अपघात होऊन चौघांचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले. मे, जून, जुलै या महिन्यातही अपघाताचे प्रमाण कमी दिसून येत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले तर अपघात टाळता येऊ शकतात. परंतु वाहन चालविताना सर्वांनाच विसर पडतो. स्वत:सोबतच इतरांचाही जीव धोक्यात घालतात.
अनियंत्रीत वेगच अपघाताला कारणीभूतजिल्ह्यात आतापर्यंत घडलेल्या अपघाताला अनियंत्रीत वेगच कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरुन सुसाट वेगाने वाहन चालविले जाते. उजव्या बाजूऐवजी डाव्या बाजूने ओव्हरटेक केले जाते. त्यामुळेही अपघात होतात. दुचाकीच्या अपघातात मोबाईलवर बोलणे आणि हेल्मेटचा वापर न करणे कारण आहे.