शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Safala Ekadashi 2022: सफला एकादशी आणि सोमवार एकाच दिवशी आल्याने हरी-हर ऐक्य दर्शवणाऱ्या मंदिराबद्दल जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 16:13 IST

Safala Ekadashi 2022: गिरवीच्या गोपाळकृष्णाची विलोभनीय मूर्ती आणि त्यामागचा इतिहास तुम्हाला नक्कीच भुरळ पाडेल!

साताऱ्याच्या फलटणपासून दक्षिणेला १२ किलोमीटरवर, कदमची गिरवी या गावात गोपाळकृष्णाचे प्राचीन सुंदर मंदिर आहे. तिथली शाळीग्राममध्ये घडवलेली चार फुटाची श्रीकृष्ण मूर्ती हरी हर ऐक्य दर्शवते. मंदिरापर्यंत नेणारी हिरवीगार पाऊलवाट, सभोवतालच्या परिसरातील निरव शांतता आणि श्रीकृष्णाची मोहून टाकणारी मूर्ती तुम्हाला तिथे पुन्हा पुन्हा जाण्यास भाग पाडेल हे नक्की!

गिरवीचे गोपाळकृष्ण मंदिर अध्यात्मिक क्षेत्रातील उपासकांसाठी अतिशय योग्य ठिकाण आहे. तिथे निवासी सोय असल्याने अनेक भाविक तिथे राहतात, सेवा देतात, उपासना करतात आणि भरपूर सकारात्मक ऊर्जा घेऊन जातात. हरी हर ऐक्य दर्शवणारी अखंड शाळिग्राम मूर्ती  मूर्ती कोणी, कशी व कधी घडवली त्याबद्दल जाणून घेऊ. 

या ठिकाणी यशोदा मातेचे काही काळ वास्तव्य असल्याने भगवान श्रीकृष्ण तिथे येत असत, असे सांगितले जाते. तसेच या मंदिराचा इतिहास असा, की ७०० वर्षांपूर्वी गिरवी येथे बाबुराव देशपांडे नावाचे सद्गृहस्थ राहत होते. ते श्रीकृष्णभक्त होते. कृष्णदर्शनाचा त्यांना ध्यास लागला होता. समाधीस्थ अवस्थेत असताना त्यांना साक्षात गोपालकृष्णाने दृष्टांत दिला आणि अमुक एका ठिकाणी शाळीग्राम मिळेल, अशी माहिती मिळाली. बाबुराव महाराजांनी शाळीग्रामचा शोध घेतला आणि खरोखरीच संबंधित जागी उत्खनन केल्यावर त्यांना शाळीग्राम मिळाला, ज्यावर विष्णुची चिन्हे होती. त्यातून गोपाळकृष्णाची साजिरी मूर्ती घडवून घ्यावी, अशी बाबुराव महाराजांची तीव्र इच्छा होती. मात्र, त्यांच्या मनासारखी मूर्ती घडवणारे कारागीर त्यांना मिळत नव्हते. बाबुराव महाराज अस्वस्थ झाले. त्यांनी कृष्णाचा धावा केला. 

काही काळातच 'जय-विजय' नावाचे दोन कारागीर बाबुराव महाराजांना येऊन भेटले. दारात आलेल्या कारागीरांची जोडी अजबच होती. त्यांच्यातला एक थोटा होता, तर दुसरा आंधळा. त्यांनी बाबूराव महाराजांना अपेक्षित असलेली मूर्ती बनवून देण्याचा दावा केला. बाबूराव महाराजांकडे पर्याय नव्हता. त्यांनी होकार दिला. दोघांची शारीरिक अडचण पाहता, ते मूर्ती कशी घडवणार, याबद्दल त्यांना कुतूहल वाटू लागले. त्यांच्या हाती शाळीग्राम सोपवून दिमतीला माणसे ठेवण्यात आली. मात्र, त्या दोघांनी एकांत मागून घेतला आणि एका खोलीत स्वत:ला बंदिस्त करून घेत संपूर्ण लक्ष मूर्तीवर केंद्रित केले. काही काळातच काम पूर्ण करून त्यांनी बाबुराव महाराजांसमोर मूर्ती ठेवली. आपल्या मनातली छबी सगुण साकार झालेली झालेली पाहून ते भावविभोर झाले. 

कुठेही जोड न लावता एकाच पाषाणाची चार फूट उंचीची  मूर्ती. त्यात कृष्ण एका पायावर उभा आहे. दुसऱ्या पायाची आढी घातली आहे.  केवळ पायाच्या अंगठ्यावर तो पाय टेकलेला आहे. यातच त्या मूर्तिकारांचे कौशल्य आहे. मूर्तीची घडण अतिशय रेखीव आहे. चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. नेत्र विशाल व आकर्षक आहेत. मूर्तीच्या शरीरावरील, गळ्यातील, हातातील, कमरेवरील अलंकार पाषाणातूनच घडविले आहेत. दोन्ही  हात उजव्या बाजूस वर मुरली वाजवीत आहेत, अशा रीतीने दोन्ही हातांची बोटे कोरली आहेत.  त्या बोटांमध्ये आपण फक्त लाकडी मुरली ठेवावयाची, तोंडाचा भाग बरोबर मुरलीवर येतो. गोकुळ वृंदावन भागातीलच अलंकारांची सर्व घडण आहे. हातावरील रेषा (शिरा) देखील स्पष्ट दिसतात. कृष्णाच्या पायाजवळ दोन्ही गायी अगदी तल्लीन होऊन कृष्णाची मुरली ऐकत आहेत, असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर आहे. तसेच दर्शनी पट्टीवर चार लहान मानवी आकृती आहेत. त्या जय-विजय व दोन  मूर्तिकारांच्या आहेत. 

या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हरि-हर ऐक्याचे घडणारे दुर्लभ दर्शन हे होय. ज्या सिंहासनावर श्रीगोपाळकृष्ण स्थापित आहेत ते सिंहासन शिवलिंगाकार (साळुंका रूपाचे) आहे. अशी मूर्ती भारतातच काय, तर जगातही सापडणे अशक्य! मूर्तीत हरीहर भेट साकारल्यामुळे त्यांचे सेवक हनुमंत, गरुड आणि नंदीही साकारले. 

मनासारखी मूर्ती घडवली, ह्या आनंदात बाबुराव महाराजांनी कारागिरांना आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले. परंतु, जेवणाआधी विहीरीवर स्नानासाठी जातो असे सांगून कारागीर अंतर्धान पावले. जणू काही, स्वत: भगवान श्रीकृष्णच आपल्या भक्ताला अभिप्रेत असलेली मूर्ती साकारून निघून गेले.

बाबुराव महाराजांना अपेक्षित असलेली प्रतिमा अपंग व्यक्तीने ज्ञानेंद्रियांनी जाणून घेतली, तर अंध व्यक्तीने आपल्या साथीदाराच्या सूचनेनुसार ती मूर्ती कर्मेंद्रियांनी घडवली. थोडक्यात, श्रीकृष्णाच्या उपदेशाप्रमाणे ज्ञानयोगाचा आणि कर्मयोगाचा पुरस्कार केला आणि भक्ती मार्गामुळे ज्ञान आणि कर्म योग प्रकट झाला. 

बाबुराव महाराजांनी मूर्तीची यथोचित पूजा करून प्रतिष्ठापना केली. मंदिराची सेवा योग्य माणसांच्या हाती सोपवली आणि इहलोकीचे कार्य संपले आहे, असे ठरवून मूर्तीस्थापनेनंतर वर्षभरातच संजीवन समाधी घेतली. ती जागा गोपालकृष्ण मंदिराच्या खाली तळघरात स्थित आहे.

गोपालकृष्ण मंदिराची माहिती बाबुराव महाराजांचे वंशज जयंत देशपांडे ह्यांच्याकडून मिळाली. देशपांडेंची सतरावी पिढी मंदिरासाठी आपले योगदान देत आहे. १९५७ मध्ये सरकारी नियमानुसार मंदिराचे ट्रस्ट करण्यात आले. तर २००५ ते २०१० मध्ये ह्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. 

गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि देशपांडे कुटुंबियांच्या सहयोगाने गोपालकृष्ण मंदिरात दरवर्षी जन्माष्टमीचा उत्सव केला जातो. भजन-कीर्तन-भागवत-ज्ञानेश्वरी पारायणे होतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला गोपाळकृष्णाच्या प्रतिमेची आणि पादुकांची मिरवणुक काढली जाते. कार्तिक महिन्यात काकड आरती होते. तर, वैशाख वद्य प्रतिपदेला बाबुराव महाराजांच्या समाधीवर अभिषेक व पूजा केली जाते. गोपाळकाल्याचे कीर्तन होते. त्यावेळेस संपूर्ण गाव गोळा होते आणि उत्सवात सहभागी होते. 

करवीर पीठाचे शंकराचार्य ,किशोरजी व्यास उर्फ स्वामी गोविंददेवगिरी, गुजरातचे स्वामी सवितानंद, स्वामी अवधूतानंद, भागवताचार्य धनंजयराव देशपांडे, मनोहर दीक्षित महाराज, वेदाचार्य विवेकशास्त्री गोडबोले, राजमाता कल्पना सरकार आदी दिग्गज मंडळींनी गोपालकृष्ण मंदिराला भेट दिली आहे. 

हा भाग दुष्काळी आहे. मात्र, मंदिरातील अनुष्ठानामुळे या पंचक्रोशीतील पावसाचे प्रमाण वाढले असल्याचे ग्रामस्थांनी अनुभवले आहे. अशा ह्या गोपालकृष्ण मंदिरात केवळ उत्सवालाच नव्हे, तर वर्षभर भक्त येत असतात. अनेक भाविकांना इच्छित मनोकामना पूर्तीचा अनुभव आल्याचे त्यांनी मंदिराच्या विश्वस्तांना कळवले आहे. ह्या मंदिराची आणि परिसराची महती प्रत्येकाने स्वत: तिथे येऊन अनुभवावी. 

फलटण एसटी स्टँडवरून गिरवीला जाणारी बस सेवा आहे.  तिथून गोंदवल्याला जाता येते. गिरविला जाताना साधकांनी भेट देण्यापूर्वी मंदिराचे व्यवस्थापक जयंत देशपांडे (९८२३००९५८९) ह्यांच्याशी संपर्क साधून पूर्वसूचना द्यावी. या मंदिराबद्दल अधिक माहितीसाठी http://gopalkrishnamandirgirvi.org/ या संकेत स्थळाला भेट द्यावी. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स