जिजाऊ जयंती : कसबा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करून स्वराज्याचा श्रीगणेशा करणारी माउली!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 12, 2021 05:09 PM2021-01-12T17:09:14+5:302021-01-12T17:09:48+5:30

जिजाऊंचे महाराष्ट्राच्या इतिहासातील स्थान अनन्यसाधारण आहे. त्या केवळ स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता नव्हत्या, तर दीनदुबळ्यांची आणि रयतेचीही माता होत्या. 

Jijau restored the Kasba Ganapati temple and started Swarajya. | जिजाऊ जयंती : कसबा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करून स्वराज्याचा श्रीगणेशा करणारी माउली!

जिजाऊ जयंती : कसबा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करून स्वराज्याचा श्रीगणेशा करणारी माउली!

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ 

सततच्या लढायांमुळे आणि मुस्लिमांच्या आक्रमणामुळे बंजर झालेली जमीन आणि आत्मसन्मान गमावलेली रयत, यांच्यात स्फुल्लिंग चेतवले, ते राजमाता जिजाऊ साहेबांनी! पाचाडच्या समाधीस्थळावर राजमाता जिजाऊंसाठी काढलेले गौरवोद्गार म्हणजे जिजामातेच्या तेजस्वी चरित्राचा सारांशच!

तुम्ही नसता तर दिसले नसते मंदिराचे कळस,
तुम्ही नसता तर दिसली नसती दारापुढे तुळस,
तुम्ही नसता तर नसते भरले पाणवठ्यावर पाणी,
सुवासिनींच्या किंकाळ्या मग विरल्या असत्या रानी,
तुम्ही नसता तर लागला नसता देवापुढे दिवा,
तुम्ही नसता तर लाभला नसता महाराष्ट्राला शिवा!

जिजाऊंचे महाराष्ट्राच्या इतिहासातील स्थान अनन्यसाधारण आहे. त्या केवळ स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता नव्हत्या, तर दीनदुबळ्यांची आणि रयतेचीही माता होत्या. 

जिजाबाई कर्तबगार तर होत्याच पण त्यांना शहाजीराजांच्या स्वप्नांचीही पूर्ण कल्पना होती. छत्रपती शहाजीराजे यांनी जिजामाता आणि बालशिवाजीला सुरक्षा हेतूने पुण्यात पाठवले. पुण्यात आल्यावर त्यांच्या निवास व्यवस्थेसाठी डौलदार लाल महाल उभा राहत असतानाच, तेथील भग्न मंदिर आणि वास्तूंचा जीर्णोद्धार केला. त्याच कालावधीत जिजाऊंनी कसबा गणेशाचे मंदिर बांधून, पुण्यभूमीत सोन्याचा नांगर फिरवून स्वराज्याचा अंकुर या मातीत पेरला. कर्नाटकातून आलेल्या ठकार कुटुंबाकडे गणरायाची पूर्जाअर्चा आणि व्यवस्था देण्यात आली. ती आजतागायत अखंड सुरू आहे. या घटना इसवीसन १६४० ते १६४२ या कालावधीत घडल्याचे इतिहास सांगतो. पुण्याची ग्रामदेवता म्हणून कसबा गणपतीची ओळख आहे. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात कसबा गणपतीला पहिले मानाचे स्थान आहे. इथून पुढे पुणे शहर आकारास आले. पुण्यात वास्तव्य असताना प्रत्येक मोहिमेपूर्वी महाराज कसबा गणपतीचे दर्शन घेऊन निघत असत.

जिजाऊंच्या कष्टाला आणि शिवबाच्या प्रयत्नाला कसबा गणपतीच्या आशीर्वादाची जोड मिळाली. जिजाऊंच्या मनात स्वराज्याचे स्वप्न बहरू लागले. ते स्वप्न शिवाजी महाराजांनी पूर्ण केले, स्वराज्याला मंगलतोरण बांधले व परकीय गुलामगिरीतून मातृभूमीची मुक्तता करत भगवा फडकवला. 

अशा या रणरागिणीची आज जयंती. जिजाऊंचे कार्य शब्दात मांडायचे, तर शब्दही अपुरे पडतील. परंतु, शाहीर हेमंत मावळे जिजाई या नावाची थोरवी व्यक्त करतात,

जि म्हणजे जिज्ञासू, जा जाणिजे जाणकार,
ई इश्वरनिष्ठेचा, छत्रपती जिजाई थोर!

 

Web Title: Jijau restored the Kasba Ganapati temple and started Swarajya.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.