वडवणी : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्यावी असे आवाहन करत सरकारने व प्रशासनाने कठोरपणे पावले उचलत नियमावली जाहीर केली असतानाही शहरातील आठवडी बाजार हाऊसफुल्ल भरला. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी एकप्रकारे आमंत्रण दिले जात आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने जमावबंदी, मोठे लग्नसमारंभ, मोर्चे, अंदोलन, धार्मिक सोहळे, सप्ताह यावर बंधने घातली आहेत. सर्व नागरिकांनी माॅस्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स ठेवून व्यवहार करण्याच्या सूचना दिल्या असतानादेखील शहरातील आठवडी बाजार हाऊसफुल्ल भरला. कुठल्याच प्रकारे कोविडबाबतचे नियम न पाळता गर्दी झाली होती. राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना वडवणीचे प्रशासन बेफिकीरपणे वागताना दिसत आहे. शहरात मास्क वापर, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर वापराच्या नियमांचा फज्जा उडाला आहे. पोलीस, तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांची भूमिका सुस्त असल्याचे दिसत येत आहे. प्रशासनाने धडक कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. विनामास्क फिरणाऱ्या व गर्दी करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
याबाबत नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी नितीन बागुल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही. त्यामुळे बाजू समजू शकली नाही. प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी प्रभारी असल्याने यंत्रणा सजग झाल्याचे दिसत नाही.
===Photopath===
240221\20210224_105329_14.jpg~240221\20210224_115828_14.jpg