संताेष स्वामी
दिंद्रुड : कोरोनाच्या महाभयंकर दुसऱ्या लाटेत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात या संसर्गाने हाहाकार माजवला होता. माजलगाव तालुक्यातील वांगी या छोट्याशा गावात तब्बल दीडशे ते दोनशे कोरोनाबाधित आढळून आले होते. कोरोना संसर्गाने सात जणांचा मृत्यू झाला. अशा गंभीर परिस्थितीला सामोरे जात यातून सहीसलामत बाहेर येण्यासाठी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत यांची भूमिका मोलाची ठरली. मागील आठ दिवसात एकही रुग्ण या गावात आढळला नसल्याने कोरोनाचा पाश सैल होताना दिसत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वांगी ग्रामस्थ अडकले होते. घराघरात संसर्गबाधित रुग्ण आढळून येत होते. कोरोनाने केवळ एका महिन्यात ७ जणांचा बळी घेतला. येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ. सत्यप्रेम खाडे यांनी घराघरात लक्षणे दिसणाऱ्यांच्या चाचण्या केल्या. कोरोनाबाधितांना माजलगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. घराघरात कोरोनासदृश आजार असणाऱ्यांना पुढे येत चाचणी करण्याचे आवाहन केले. येथील सरपंच संध्या दीपक जाधव, ग्रामसेवक दत्तात्रेय मानकर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी यांनी मोलाची भूमिका निभावत कोरोनाच्या संकटावर मात केली. गेल्या आठ दिवसांत एकही रुग्ण या गावात सापडलेला नाही. ग्रामस्थांनी या संकटात प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन केल्यामुळे गाव आज कोरोनामुक्त झाले आहे.
वांगी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या आवाहनाला साथ देत नियमांचे पालन केले. स्वच्छता, मास्क व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब केला. गाव अध्यात्मिक असल्याने एकमेकांशी संवाद साधत कोरोनाला हद्दपार केले.
- संध्या दीपक जाधव, सरपंच.
संसर्ग कमी झाल्यामुळे वांगी ग्रामस्थांनी निष्काळजीपणा न दाखवता, त्रिसूत्रीचे पालन करावे. साथीच्या आजारांवर तत्काळ उपचार करून घ्यावेत. कुठलाही संसर्गजन्य लक्षणे आढळल्यास न लपवता चाचणी करून घेणे गरजेचे आहे. गावाच्या सुरक्षेसाठी सर्व ग्रामस्थांनी पुढे येत दाखवलेला एकोपा कौतुकास्पद आहे. - डाॅ. सत्यप्रेम खाडे,
समुदाय आरोग्य अधिकारी, प्रा. उपकेंद्र, वांगी