लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : पत्नीला घेऊन जाण्यासाठी सासरवाडीत आलेल्या जावयाला नातेवाइकांनी विषारी द्रव पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना अंबाजोगाई शहरातील रविवार पेठेत शनिवारी (१९ जून) सकाळी घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जयराम हनुमंत गिरी (३५, रा. बीएसएनएल कार्यालयामागे, केज) असे जावयाचे नाव आहे. अंबाजोगाईतील रविवार पेठेत त्यांची सासरवाडी आहे. पत्नी पूजाशी त्यांचे बिनसले होते. त्यामुळे ती माहेरी आली होती. तिला घेण्यासाठी १९ रोजी जयराम गिरी हे अंबाजोगाईला आले होते. यावेळी त्यांना ‘तू इथे का आला. आम्ही पूजाला तुझ्याकडे पाठविणार नाहीत, असे म्हणत तीन नातेवाइकांनी लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर त्यांचे दोन्ही हात घट्ट पकडून बळजबरीने तोंडात विषारी औषध ओतले. जयराम गिरी हे उपचार घेऊन बरे झाले. त्यांच्या जबाबावरून अप्पा माणिक गिरी, माणिक गिरी व अलका गिरी यांच्यावर शहर पोलिसांत जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला. हे तिन्ही नातेवाईक जावई गिरी यांचे चुलत सासरे व मावस सासू आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपी फरार झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक गव्हाणे पुढील तपास करीत आहेत.