- नितीन कांबळेकडा- पिकाला पाणी देऊन झाल्यावर विद्युत पंप बंद करण्यासाठी गेले असता स्टार्टरला हात लावताच विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने तरूण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, सोमवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान डोंगरगण येथे घडली. संदीप मुरलीधर कर्डीले ( ४२) असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील शेतकरी संदीप मुरलीधर कर्डिले (४२) हे सोमवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान स्वत:च्या शेतात पिकाला पाणी देत होते. पाणी देऊन झाल्यावर विद्युत मोटार बंद करताना स्टार्टरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याचा धक्का बसून संदीप दूर फेकल्या गेले. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच गावात हळहळ व्यक्त होत आहे.