अंबाजोगाई (बीड): लव्हजिहाद व धर्मांतर विरोधी कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात यावा. गोहत्या रोखण्यात याव्यात. या प्रमुख मागण्यांसाठी आज अंबाजोगाईत भव्य हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा निघाला.
सकाळी हा मोर्चा कुत्तरविहिर परिसरातील तानाजी मालुसरे चौकातून निघाला. यावेळी मध्यवर्ती हनुमान मंदिरात महाआरती करून मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोंचला. येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मोर्चातील निवडक प्रतिनिधींनी मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांना सादर केले. बसस्थानक परिसर, मंडीबाजार, मंगळवारपेठ, गुरुवारपेठ, कुत्तरविहीर व शहरातील अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आपली दुकाने बंद ठेवत मोर्चातही सहभाग नोंदवला होता. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
भगवे झेंडे, भगव्या टोप्यांनी वेधले लक्षमोर्चातील सहभागींनी डोक्यावर भगवी टोपी परिधान केली होती. तसेच मोठमोठे भगवेझेंडे लक्षवेधी ठरले. अनेक शेतकरी व पशुपालकांनी गाईंसह मोर्चात सहभाग घेत पशुपालन व गोमतेचे रक्षण व संवर्धनाचा संदेश दिला. मोर्चात तालुक्यातील हिंदू समाजबांधव, महिला व युवकांचा मोठा सहभाग होता.