पाटोदा : दिल्लीच्या सीमेवर गत सात महिन्यांपासून शेतकरी काळे कायदे रद्द करा म्हणून आंदोलन करत आहेत. यात पाचशे शेतकरी शहीद झाले आहेत. मात्र केंद्र सरकार आपला अहंकार सोडत नाहीत. कामगारांना देशोधडीला लावणारे बदल कायद्यात केलेत. शेतकरी विरोधी काळे कायदे तत्काळ रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी पाटोदा तहसील कार्यालयासमोर भाकप आणि किसान सभेच्या वतीने गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी कॉ. महादेव नागरगोजे म्हणाले की, देशात पेट्रोल, डिझेलचे भाव दुपटीने वाढले आहेत. परिणामी महागाई वाढली. शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला, आरोग्य सेवा ढासळली. बेरोजगारांच्या संख्येचा डोंगर झाला असल्याचा आरोप कॉ. नागरगोजे यांनी केला.
यावेळी तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकरी विरोधी संमत करण्यात आलेले तीन काळे कायदे रद्द करा, कामगार कायद्यामध्ये केलेले बदल त्वरित करा, कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी लसीकरणाची मोहीम सरसकट राबवा, आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात कॉ. महादेव नागरगोजे, शेकापचे विष्णुपंत घोलप, भोसले आदींसह तालुक्यातील शेतकरी, कामगार, बेरोजगार तरुण शेतीवर उपजीविका करणारे शेतमजूर कोरोनाच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करून आंदोलनात सहभागी झाले होते.
010721\01bed_9_01072021_14.jpg