परळी शून्य : ग्रामीण भागातील संख्याही चार
परळी : कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात आटोक्यात आली असून, बीड जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. परळी शहर बीड जिल्ह्यातील पहिले कोरोनामुक्त शहर बनले असून, आज शहरात शून्य, तर ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चारवर येऊन ठेपल्याने लवकरच परळी तालुकाही कोरोनामुक्त होईल, असे दिसत आहे.
मेच्या शेवटच्या आठवड्यात परळी तालुक्यातील वाढता रुग्णवाढीचा आलेख कमी होण्यास सुरुवात झाली होती. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे सातत्याने कोरोना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. दुसऱ्या लाटेत निर्माण झालेल्या औषधांचा तुटवडा, ऑक्सिजन पुरवठा, कोविड सेंटरला आवश्यक साहित्याचा पुरवठा केल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत झाली. माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांनीही कोविड सेंटरच्या माध्यमातून तसेच आवश्यक बाबींवर शासनाकडे पाठपुरावा केला.
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस, काॅंग्रेस, भाजप, शिवसेना आदी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, महसूल विभाग, आरोग्य विभाग, डाॅक्टर, परिचारिका, परळी नगरपालिका, पंचायत समिती, पोलीस, सर्व शिक्षक, नगरपालिका कर्मचारी, पत्रकार यांनी दिवसरात्र परिश्रम घेतले. अनेक पत्रकारांनी सकारात्मक बातम्या, लेख प्रकाशित करून जनतेच्या मनातील कोरोनाची भीती कमी करण्याचे काम केले.
तालुक्यातील जनतेनेही शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करून शासनास सहकार्य केले. त्यामुळे परळी तालुक्यात कोरोना आटोक्यात येण्यास फार मोठी मदत झाली आहे. यापुढेही जनतेने नियमांचे पालन केल्यास कोरोनाची कोणतीही लाट तालुक्यात शिरकाव करू शकणार नाही. आज शहरात रुग्णसंख्या शून्य आहे, तर ग्रामीण भागातील संख्या चार आहे. तीसुद्धा लवकरच शून्यावर येईल, असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते रानबा गायकवाड यांनी व्यक्त केला.