पुरुषोत्तम करवा
माजलगाव : मागील दोन वर्षांत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सलग दुसऱ्यावर्षी आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूर यात्रा बंदच राहिल्याने याचा फटका येथील आगारास बसला आहे. दोन वर्षांत या आगारास १७ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाल्याने या आगारास चांगलाच फटका बसला आहे.
आषाढ महिन्यात कोणत्याच कार्यक्रमाला मुहूर्त नसल्याने प्रवाशांची वर्दळ या महिन्यात कमीच असते. तरी या महिन्यात केवळ पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या राहत असल्याने आगाराकडून प्रवाशांसाठी विशेष सोय केली जाते. यात ज्या गावातून बस भरून प्रवासी जाण्यास तयार असतील, त्या गावात बस पाठवण्यात येत असे. यामुळे भाविकांची अडचण होत नसे. त्यामुळे प्रवासी खासगी वाहनापेक्षा बसला पसंती देत असत.
दोन वर्षांच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव राहिल्याने गेल्यावर्षी व यावर्षी पंढरपूर यात्रा रद्द केल्याने येथील आगारातून एकही बस जाऊ शकली नाही. यामुळे या आगारास चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत आहे. या आजारातून २०१९ ला १२६ फेऱ्या झाल्या. या वाहनांनी २६ हजार ८०० कि.मी.अंतर पूर्ण केले. यात ४ हजार २०० प्रवाशांनी प्रवास केला. यामुळे या आगारास ८ लाख ५० हजार रुपये उत्पन्न मिळाले होते.
२०१९ च्या आषाढी वारीचा विचार करता, २०२० व २०२१ ला याच तुलनेत नुकसान झाले असल्याचा अंदाज येथील आगाराने काढला असल्याची माहिती आगारप्रमुख दत्तात्रय काळम-पाटील यांनी दिली.