लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : सध्या कोरोना लाॅकडाऊन सुरू आहे. शेतकरी शेतात जाणे पसंत करत असले, तरी यंदाच्या वर्षी खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला गती आली आहे. ९७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीपूर्व खरिपाचा पेरा होणार असल्याचा अंदाज आहे.
आष्टी तालुक्यातील शेतकरी मशागतीच्या कामात गुंतला आहे. मागीलवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने रब्बीचा पेरा चांगला झाला. आता पिकासाठी पाणी टंचाई नसल्याने रब्बीतून मोकळी केलेली जमीन खरीप
हंगामासाठी तयार करण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शेतकरी आपल्या शेतात नांगरणी, तण वेचणी, शेणखत टाकणी यासह पेरणीपूर्व शेतीची कामे करीत आहेत. पाऊस पडला की, लगेच चाड्यावर मूठ धरण्यासाठी शेतकरी शेतीची मशागत करीत आहे.
आष्टी तालुक्यात कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ९७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. शेतक-यांनी पावसाळ्याच्या तोंडावर मशागतीचे कामे सुरू केली आहेत.
....
प्रस्तावित खरीप पिकाची हेक्टरनिहाय आकडेवारी अशी..
कापूस- २१५७२, तूर- २१६०४, उडीद- १८९४९, मूग- ९०००, बाजरी- १६०००, मका- १५००, सोयाबीन -५८०० असे एकूण ९७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत.
....
सहा इंच जमीन ओली होऊ द्या
खरीप हंगामातील पेरणीची घाई न करता ७५ ते १०० मिली पाऊस झाल्यावर किंवा किमान ६ इंच जमीन ओली झाल्यानंतर पेरणी करताना बीज प्रक्रिया करून पेरणी करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.