कडा : खरीप हंगामातील पेरणीच्या तोंडावर कृषी विभागाकडून जनजागृतीसह मार्गदर्शन केले जात आहे. शेतकऱ्यांनी घरच्या बियाण्यांचा वापर करून त्याची बीज प्रक्रिया केली तर त्याची उगवण क्षमता अधिक चांगली असते, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले.
आष्टी तालुक्यातील चोभानिमगाव येथील शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करीत होते. कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन केले जात आहे. यात शेतकऱ्यांनी घरच्या बियाण्यांचा वापर करणे, बीज प्रक्रिया करणे, उगवण क्षमता तपासणे, कांदा साठवण, वरंबा व सरी पद्धतीने सोयाबीन पेरणी यासह शेतीविषयक माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी रविकांत शितोरे, प्राजक्ता राऊत, धोंडे यांनीदेखील मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन वेळी गावातील सरपंच, उपसरपंच, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.