लोकमत न्यूज नेटवर्कबीड : धनगर समाजाच्या आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या टीस संस्थेने नकारात्मक अहवाल दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आश्वासने हवेत विरली. या सरकारने आरक्षणाबाबत समाजाचा विश्वासघात केला. आता आरक्षणासाठी कठोर पावले उचलली जातील. सरकारला काम करणेही अवघड होईल अशी आंदोलने करण्याचा इशारा माजी मंत्री तथा धनगर समाज महासंघाचे संस्थापक अण्णासाहेब डांगे यांनी दिला.बीड येथे धनगर समाज कर्मचारी महासंघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अण्णासाहेब डांगे आले होते. कार्यक्रमापूर्वी रविवारी सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर कडाडून टीका केली.धनगर व धनगड हे शब्द एकच आहेत. या सरकारने हे शब्द वेगवेगळे दाखवून समाजाची दिशाभूल केली. समाजाला आरक्षणापासून दूर ठेवले. आज, उद्या आरक्षण देऊ असे म्हणत अभ्यास करण्यासाठी टीस ही संस्था नियुक्त केली. ही संस्थाही मुख्यमंत्र्यांनी सोडलेले पिल्लू आहे. त्यामुळे तिच्याकडून सकारात्मक अहवालाची काय अपेक्षा ठेवणार असा खुलासाही त्यांनी केला. फडणवीस सरकारने केवळ मतांसाठी समाजाचा वापर केला, विश्वासघात केला. परंतु आता यापुढे स्वस्थ बसणार नाही. कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलने केली जातील. या सरकारला काम करणेही अवघड होईल, असा इशाराही डांगे यांनी दिला.यावेळी समाजाच्या इतर प्रश्नांवरही त्यांनी चर्चा केली. सोबत बीड येथील धनगर कर्मचारी महासंघाचे अंकुश निर्मळ, मल्हार सेनेचे अमर ढोणे, प्रकाश कानगावकर सह समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारने धनगर समाजाचा विश्वासघात केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:25 IST
धनगर समाजाच्या आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या टीस संस्थेने नकारात्मक अहवाल दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आश्वासने हवेत विरली. या सरकारने आरक्षणाबाबत समाजाचा विश्वासघात केला. आता आरक्षणासाठी कठोर पावले उचलली जातील. सरकारला काम करणेही अवघड होईल अशी आंदोलने करण्याचा इशारा माजी मंत्री तथा धनगर समाज महासंघाचे संस्थापक अण्णासाहेब डांगे यांनी दिला.
सरकारने धनगर समाजाचा विश्वासघात केला
ठळक मुद्देपत्रकार परिषद : धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांचा आरोप