लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : खरीप हंगामातील पिकांची पेरणी जोरात सुरु आहे. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमधून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी पीकविमा भरण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यासाठी अंतिम तारीख ही १५ जुलै ही असणार आहे.
यावर्षी खरीप हंगामाचे क्षेत्र हे ७ लाख ९१ हेक्टर इतके आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, कांदा, बाजरी, मका, खरीप ज्वारी, भुईमूग अशा प्रकारची पिके घेतली जातात. दरम्यान, शेतकऱ्यांना प्रतिकूल हवामान घटकामुळे पेरलेले न उगवणे, हवामानातील बदलामुळे झालेले नुकसान, काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पन्नात घट, काढणी पश्चात नुकसान स्थानिक आपत्ती इत्यादी बाबींकरिता विम्याचे संरक्षण मिळणार आहे. अर्ज भरण्यासाठी बँकांमध्ये गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरणे सुलभ व्हावे, यासाठी गावपातळीवर अधिकची सुविधा म्हणून नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्राद्वारे व बँकेमार्फत योजनेत सहभागी होता येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होऊन प्रतिकूल परिस्थितीत पिकांना संरक्षण मिळवून द्यावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
....
पीकविमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना आधार कार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, शेतजमिनीचा ७,१२ उतारा, स्वयंघोषित पेरणी प्रमाणपत्र, जर कुळासाठी लाभ घ्यायचा असेल तर भाडेपट्टी करार असलेला शेतकऱ्यांचा करारनामा देणे आवश्यक आहे. तसेच ही योजना ऐच्छिक असल्याने कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर त्यांनी विहित मुदतीत कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस तसे लेखी कळविणे अनिवार्य आहे.
पिकांच्या संरक्षणासाठी पीकविमा शेतकरी दरवर्षी भरतात. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्व नियमांचे पालन करून पीकविमा भरावा. आपले सरकारवर विमा हप्त्याव्यतिरिक्त जादा रक्कम देण्याची आवश्यकता नाही. तसे केल्यास त्या केंद्राविरुद्ध तक्रार करावी. त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
-दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, बीड.
....
खरीप हंगामासाठी संरक्षित रक्कम, शेतकरी विमा हप्ता
पीकविमा संरक्षित रक्क्म प्रतिहेक्टरी शेतकरी विमा हप्ता प्रति हेक्टर
सोयाबीन ४५००० ९००
कापूस ४५००० २२५०
कांदा ६५००० ३२५०
बाजरी २२००० ४४०
मका ३०००० ६००
तूर ३५००० ७००
मूग २०००० ४००
उडीद २०००० ४००
भुईमूग ४५००० ९००
खरीप ज्वारी २५००० ५००