अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : वरून हिरवे तर आतून पिवळे असणारे रंगीत टरबूज ‘आरोही’चे देवळा (ता.अंबाजोगाई) येथे उत्पादन झाले आहे. या रंगीत टरबुजाला परदेशातून मागणी होत आहे. ही किमया युवक शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी साधली. या प्रयोगातून त्यांनी दोन महिन्यांत केवळ ३० गुंठे जमिनीत दीड लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे.
जे विकेल ते पिकेल, या धर्तीवर शेतीत नवीन उत्पादन घेतले तर निश्चितच त्याचा फायदा होतो.
देवळा येथील प्रयोगशील शेतकरी रवींद्र भानुदासराव देवरवाडे यांनी नोन यु सिड्स अरोही आणि विशाला अशा दोन प्रजातीच्या रंगीत टरबुजाचे उत्पादन घेतले. हे टरबूज वरून हिरवे आणि आतून पिवळे तर वरून पिवळे आणि आतून लाल अशा रंगाचे आहे. ३० गुंठे जमिनीत पाच हजार रोपांची लागवड २४ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. पहिली तोड २३ जानेवारीला झाली. अवघ्या दोन महिन्यांत साधारण ४ किलो ते ५ किलो वजनाचे फळ झाले आहे. लागवड हिवाळ्यातील असून बदलत्या हवामानाचा कसलाही फरक पडला नाही. आपल्या महाराष्ट्रातही उत्तम रंगीत टरबूज येऊ शकते, हे या प्रयोगातून शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी योग्य नियोजनातून सिद्ध केले. अशा प्रयोगामुळे शेतकऱ्यांना नवनवीन वाण हे बाजारपेठेत मागणी असणारे व उत्तम नफा मिळवून देणारे पीक आहे. रिलायन्स मॉल मुंबई यांनी जागेवर येऊन या टरबुजाची खरेदी केली आहे. हे टरबूज तैवान देशात लोकप्रिय असून याला मोठ्या शहरातही मागणी आहे. देवरवाडे यांनी शेती आधुनिक व तंत्रज्ञानाची जोड देऊन केल्यास निश्चित यश व मोबदला मिळतो. याची प्रचीती नव्या पिढीसमोर ठेवली आहे.