अंबाजोगाई - भारत सरकारच्या बी.एस.एन.एल.च्या वतीने सुरू असणारी इंटरनेट सेवा सातत्याने विस्कळीत होत असल्याने ग्राहकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अंबाजोगाई शहरात गेल्या आठवडाभरापासून ही सेवा सातत्याने विस्कळीत होत चालली आहे.
अंबाजोगाई तालुक्यात बी.एस.एन.एल. इंटरनेट सेवेचे ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत. सायबर कॅफे, शासकीय कार्यालये, राष्ट्रीयीकृत बँका, नागरी बँका व निमशासकीय कार्यालयांत इंटरनेट सेवेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. सर्व उपकरणे इंटरनेटशी जोडली गेल्यामुळे कामकाजाची संपूर्ण भिस्त संगणकावरच अवलंबून आहे. सतत खंडित होणाऱ्या इंटरनेट सेवेमुळे मोठ्या प्रमाणात दैनंदिन कामे रखडली जात आहेत. परिणामी नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. सुरू झालेली ऑनलाइन यंत्रणा कोलमडू लागल्याने मोठ्या अडचणी सर्वत्र निर्माण होत आहेत.
इंटरनेट सेवेबरोबरच टेलिफोन सेवा देखील नादुरुस्त झाली आहे. शहरात सर्वच ठिकाणी असलेल्या फोनमध्ये घरघर आवाज ऐकू येतो. अगोदरच फोनसेवेपासून दुरावत चाललेल्या ग्राहकांना ही सेवा व्यवस्थित न मिळाल्याने आहे ते फोनही बंद पडतात की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. ही सेवा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा शहरवासीयांच्या वतीने देण्यात आला आहे.