धारूर : समाज मंदिरासमोरील अतिक्रमण हटविण्यासाठी तालुक्यातील रुईधारूर येथील ग्रामस्थांनी धारूर पंचायत समितीसमोर व रुईधारूर ग्रामपंचायतसमोर तीन दिवसांपासून सुरू केलेल्या उपोषणाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली. प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
तालुक्यातील रुई धारूर येथे समाज मंदिरासमोर असणारे अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी तीन दिवसांपासून ग्रामस्थांचे उपोषण सुरू होते. गटविकास अधिकारी रजेवर असल्याने एक ही अधिकारी व कर्मचारी या उपोषणकर्त्यांकडे फिरकला नाही. उपोषण दरम्यान प्रकृती बिघडल्याने मंगळवारी एक तर बुधवारी दोन महिला उपोषणकर्त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. ही बाब समजल्यानंतर जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी निर्देश दिले. त्यानुसार नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणा हाताळून या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे समजून घेतले. तसेच लेखी आश्वासन देण्यास पंचायत समिती प्रशासनाला सूचना केली. बुधवारी तहसीलदार वंदना शिडोळकर, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, गटविकास अधिकारी प्रज्ञा माने, पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी दोन्ही ठिकाणच्या उपोषणकर्त्यांना एक महिन्यात कारवाईचे लेखी आश्वासन दिले.