गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खारपाणपट्टयात सर्वाधिक मागणी असलेल्या संकरीत कपाशीच्या विशिष्ठ वाणाची मागणी आता जिल्ह्याभरात वाढली आहे. गतवर्षी कृषी कर्मचाऱ्याच्या कृषी उपस्थितीत व पोलिस बंदोबस्तात बियाणे विकण्याची वेळ कृषी विभागावर आली होती. यातून यंदा काही धडा घेतल्याचे दिसत नाही, अशा परिस्थितीत यावेळी 'त्या' वाणांचा पुरवठा कमी झाल्याने तुटवडा पडण्याची शक्यता आहे.
चार दिवसात मान्सून धडाका देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर चार दिवसांपासून पावसाची उसंत असल्याने शेतकऱ्यांद्वारा पेरणीपूर्व मशागत सुरू आहे. मागच्या हंगामात कपाशीच्या एका विशिष्ठ वाणाची मागणी जास्त होती. त्यातुलनेत कंपनीद्वारा कमी पुरवठा करण्यात आल्याने बियाणे उपलब्ध असलेल्या केंद्रात कृषी विभागाने रेशनिंग केले होते. तेथे कृषी सहायकांच्या निगराणीत व पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बियाणे विक्री करण्यात आली होती.
यंदादेखील 'त्या वाणाची मागणीसोबतच त्याच कंपनीच्या अन्य एक वाणाची मागणी वाढत आहे. माहितीनुसार यंदा १.२० लाख पाकिटांची मागणी कंपनीकडे नोंदविण्यात आलेली आहे. शिवाय कपाशीच्या अन्य वाणांचेही बियाणे पुरेसे उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
कपाशीच्या 'त्या' बियाण्यांची जिल्हास्थितीयंदा कपाशीच्या 'त्या' वाणाच्या १.२० लाख पाकिटांची मागणी कंपनीकडे नोंदविली होती. त्यातुलनेत ७४,१२० पाकिटे जिल्ह्यात उपलब्ध झाली आहेत. यामध्ये अमरावतीमध्ये सर्वाधिक ३९,७६०, धामणगाव ७,८४०, दर्यापूर ११,३००, भातकुली १९८०, अंजनगाव २६४०, अचलपूर १९८०, मोर्शी २७८०, वरूड २३६० व तिवसा तालुक्यात ३४८० पाकिटांचा पुरवठा झालेला आहे.
विशिष्ठ वाणांच्या मागणीचे जिल्ह्यात विविध बेल्टजिल्ह्यात केवळ संकरीत कपाशीच्या त्याच वाणाची मागणी आहे, असे नव्हे तर प्रत्येक बेल्टमध्ये वेगवेगळ्या वाणांची मागणी असल्याचे एसएओ सातपुते यांनी सांगितले. वरूड, मोर्शी तालुक्यात वेगळ्याच वाणाची आहे, तर चांदूर रेल्वे, धामणगाव तालुक्यात कपाशीच्या वेगळ्या वाणाची मागणी असते.
"संकरीत कपाशीच्या सर्वच वाणांची उत्पादकता सारखीच आहे. शेतकऱ्यांनी विशिष्ठ वाणाचा आग्रह धरू नये, बियाण्यांसाठी कंपनी एकत्रितपणे मागणी नोंदविते, त्या वाणांच्या बियाण्यासाठी कंपनीला पत्र दिले आहे."- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी