जनमताचा कौल : ४४ ग्रामपंचायतींचा निकाल
अमरावती : तालुक्यातील अंजनगाव बारी, पुसदा, शिराळा, माहुली जहागीर, नांदगाव पेठ या मोठ्या ग्रामपंचायतींसह ४६पैकी अविरोध दोन वगळून ४४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली, तर दोन ग्रामपंचायत अविरोध झाल्या आहेत. १८ जानेवारीला विलासनगर येथील शासकीय गोदामात सकाळी १० पासून मतमोजणीला प्रारंभ झाला. या मतमोजणीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. यात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह गावनेतेही एकमेकांविरुद्ध निवडणूक रिंगणात उतरले होते. मतमोजणी १५ टेबलवर करण्यात आली. ४४ ग्रामपंचायतीसाठी ९३३ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी ३८६ सदस्य झाले, तर ३० जण बिनविरोध निवडून आलेले आहेत. असे एकूण ४६ ग्रामपंचायतीमध्ये ४१६ विजयी झाले आहेत. दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर करण्यात आला. मतमोजणीची प्रक्रिया तहसीलदार संतोष काकडे, नायब तहसीलदार प्रवीण देशमुख, निवासी तहसीलदार गोपाल कडू, नायब तहसीलदार दिनेश बढिये, प्रज्ञा मेहंडुले आदींच्या मार्गदर्शनात पार पडली.