लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. २८ मे रोजी सकाळी ९:३० ते १०:३० या कालावधीत वरूड तालुक्यातील आमनेर येथे ही घटना घडली. लग्नात आंदण कमी दिले म्हणून पतीसह सासरच्या मंडळीने तिचा अनन्वित छळ चालविला होता, अशी तक्रार मृताच्या पित्याने वरूड पोलिसांत नोंदविली. त्याआधारे पोलिसांनी २८ मे रोजी सायंकाळी मृताच्या पतीसह दीर व एका महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला. तिघांनाही बुधवारी रात्रीच अटक करण्यात आली. अर्शिया शेख फईम (वय २७) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
अब्दुल फईम अब्दुल रहीम (३४), अब्दुल नदीम अब्दुल रहीम (३०) व एक महिला (सर्व रा. आमनेर, वरूड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथील रहिवासी अकबर खान सदर खान (५५) यांनी याबाबत तक्रार नोंदविली. एफआयआरनुसार, अकबर खान यांची मुलगी अर्शिया हिचे सन २०२२ मध्ये अब्दुल फईम याच्यासोबत लग्न झाले. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यावर लग्नात आंदण कमी दिल्याच्या कारणावरून पती अब्दुल फईम, दीर अब्दुल नदीम व सासू यांनी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. या सततच्या छळाला कंटाळून तिने २८ मे रोजी सकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. घटनेनंतर मृत विवाहितेचे वडील अकबर खान यांनी वरूड ठाण्यात तक्रार दाखल केली.
अशी आहे तक्रारलग्नात आंदण कमी दिल्याच्या कारणावरून पतीसह सासू व दिराने छळ केल्याने आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप अकबर खान यांनी केला. त्या आधारे वरूड पोलिसांनी पती अब्दुल फईमसह दीर अब्दुल नदीम व सासू अशा तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला. त्यांना रात्रीच ताब्यात घेतले.गुरुवारी तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.