सुरेश सवळे चांदूरबाजारसततच्या नापिकीमुळे शेतकरी वैतागला आहे. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाने विशेष पॅकेजही घोषित केले. मात्र त्याचा परिणाम जाणवत नाही. अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात वर्षाच्या दीड महिन्यात १११ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात गत चार वर्षांतील ४० टक्के आत्महत्या सरकारी मदतीला पात्र ठरल्या. त्याचा सर्वाधिक फटका अमरावती व वाशिम जिल्ह्याला बसला. याची दखल राष्ट्रीय मानवधिकार आयोगाने घेत राज्याच्या मुख्य सचिवांना दोन आठवड्यात खुलासा करण्याचे नोटीसीद्वारे बजावले आहे. यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात २०११ ते २०१४ या चार वर्षात ३ हजार ७१६ तर चालू वर्षाच्या दीड महिन्यात १११ अशा ३ हजार ८२७ शेतकरी आत्महत्या झाल्यात. यापैकी एक हजार ८८९ शेतकरी आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आल्या. शासकीय मदतीस पात्र प्रकरणाची टक्केवारी पाहता अमरावती ३५ टक्के, वाशिम ३६ टक्के, यवतमाळ ३८ टक्के, बुलडाणा ६० टक्के तर अकोला ५० टक्के आहे. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास त्याचा कुटुंबियांना एक लाखाची सानुग्रह आर्थिक मदत केली जाते. त्यातही त्याला केवळ ३० हजार रुपये रोख दिले जाते तर ७० हजारांचा सहा वर्षांचा बाँड दिला जातो. हा बाँड तहसीलदारांच्या नावे असतो. मध्यंतरी ५० हजारांची अतिरिक्त मदत केंद्रशासनाकडून देण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र त्याची अमलबजावणी अद्यापही झालेली नाही. तालुकास्तरावर गठीत केलेल्या शेतकरी आत्महत्या निवारण समितीचा निर्णयसुध्दा या आर्थिक मदतीसाठी पात्र ठरणाऱ्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. या समितीच्या सिफारशीनुसारच पात्र-अपात्रतेच्या निकर्ष काढला जातो. गेल्या चार वर्षांत ५ हजार ६९८ शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद शासनदप्तरी आहे. त्यापैकी ३ हजार ८२७ शेतकरी आत्महत्या अमरावती सह वर्धा जिल्हा या सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात झाल्या तर १ हजार ८७१ आत्महत्या राज्याच्या इतर भागात झाल्या. यात २ हजार ७३१ आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आल्या. त्यात विदर्भातील ६४० अपात्र ठरविण्यात आल्या. २०१२ मध्ये ९५० पैकी ५१६ अपात्र. २०१३ मधील ८०५ पैकी ३९७ अपात्र. २०१४ मधील ९६२ पैकी ३३० अपात्र तर २०१५ च्या सुरुवातीचा दीड महिन्यात १४९ शेतकरी आत्महत्या झाल्या, त्यात ६ आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.
दोन महिन्यांतच जिल्ह्यात आत्महत्येचे शतक
By admin | Updated: February 23, 2015 00:55 IST