चांदूररेल्वे : तालुक्यातील तरोडा गावात होणारा प्रस्तावित बालविवाह नियोजित वेळेच्या अवघ्या १० मिनिटांआधी थांबविण्यात आला. अमरावतीच्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाने ही कार्यवाही केली.
सोमवारी सकाळी १० वाजता वर्धा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह अमरावती जिल्ह्यातील तरोडा या गावी होत असल्याची माहिती वर्धा येथील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर यांनी अमरावतीचे बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांना दिली. डबले यांनी तात्काळ दखल घेऊन सदर प्रकरणाची चौकशी करून चांदुर रेल्वेच्या ठाणेदारांना माहिती दिली. डबले यांनी तीन पोलीस कर्मचाºयांसह विवाह स्थळ गाठले. सदर ठिकाणी शुभमंगल गाथा चालू होती. वेळीच तेथे हस्तक्षेप करून ते थांबविण्यात आले.
गावातील सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका यांना सदर ठिकाणी बोलविण्यात आले. त्यांना प्रथमत: सदर विवाह हा बालविवाह आहे, बालविवाह प्रतिबंध कायद्या अन्वये मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. अन्यथा तो बालविवाह ठरतो, अशी माहिती देण्यात आली व तेथील वधू, वर, त्यांचे नातेवाईक, गावकरी यांची समजूत काढण्यात आली. सदर विवाहाला स्थगिती देऊन वधू वर, नातेवाईक यांना बाल कल्याण समिती समोर हजर करणे आवश्यक आहे, अशी माहिती दिली. व सर्वांना सोबत घेऊन बाल कल्याण समिती अमरावती यांच्यासमोर हजर करण्यात आले.
बाल कल्याण समिती सदस्यामीना दंढले, अंजली घुलक्षे यांच्या समक्ष वधू वर, नातेवाईक, सरपंच, अंगणवाडी सेविका यांचा जबाब वजा हमीपत्र लिहून घेण्यात आले. सदर बालिकेला दर १५ दिवसांनी बाल कल्याण समिती समक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.
--------