अमरावती : दिवसा-ढवळ्या चोरटे शहरात चोरी करुन लाखो रुपयांचा माल उडवून नेत आहे. चोरीचे सत्र हे सुरुच असून या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे उभे ठाकल्याने राज्य चोरट्यांचे की पोलिसांचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या महिनाभरात चोरट्यांनी शहरात चोराचा सपाटा लावून २१ घरफोड्या केल्या. अशातच त्यांनी पुन्हा एकदा मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहराचे हृदयस्थान असलेल्या राजकमल चौकात मोबाईल शॉपी फोडून हजारो रुपयांचा माल चोरुन नेल्याने चोरट्यांना पकडण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. शहरातील राजापेठ पोलीस ठाणे चोरट्यांचे क्रीम ठाणे असल्याचे समजले जात आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंग व घरफोड्यांच्या सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. चोरट्यांनी महिनाभरात राजापेठ, गाडगेनगर व फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ घरफोड्या करुन लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या घटनांच्या तुलनेत पोलिसांचे डीटेक्शनचे प्रमाण हे शून्य आहे. त्यामुळे चोऱ्या थांबविण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न नागरिकांपुढे आहे. चोरट्यांना धडा शिकविण्याची वेळ आल्याचे पाहून शहरातील साईनगर परिसरातील काही नागरिक परिसरात काठ्या घेऊन गस्त करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, हे विशेष.
राज्य कोणाचे, चोरट्यांचे की पोलीसांचे ?
By admin | Updated: June 11, 2014 23:00 IST