दर्यापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने संचारबंदीत २२ मे पर्यंत वाढ करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची पेरणीची वेळ जवळ आली आहे. त्यासाठी बियाणे व खतांच्या तरतुदीसाठी राखून ठेवलेले धान्य विकण्याकरिता बाजार समिती चालू असणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक असल्याचे मत बाजार समिती सभापतींनी व्यक्त केले.
व्यापाऱ्यांचा माल बाजार समितीच्या यार्डवर तसाच पडलेला आहे. त्यामुळे त्यांना माल बाहेर नेणे आवश्यक असल्यामुळे धान्यमाल बाहेर नेण्याकरिता परवानगी देण्यात यावी. त्याचप्रमाणे कृषी केंद्रांवर सर्व शेतकरी ऑनलाइन बियाण्यांची बुकिंग करू शकत नाहीत. शेतकरी आपल्या सोयीनुसार व तडजोड करून बियाणे खरेदी करतो. काही शेतकरी धान्य विकून, उसने घेऊन, तर काही बँक मिळाल्यावर व काही शेतकरी सावकाराकडून कर्ज काढून बियाणे विकत घेतात. एकाच वेळी सर्व शेतकरी बियाणे विकत घेऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे कृषी केंद्रावरून सर्व शेतकऱ्यांना घरपोच बियाणे पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच कृषी केंद्रे चालू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी, असे निवेदन येथील बाजार समितीचे सभापती बाबाराव बरवट यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना पाठविले.