परतवाडा : मेळघाटच्या अतिदुर्गम भागातून धारणीकरिता परतवाडा-परसापूर-अंबापाटी-ढाकणामार्गे धारणी ही एकमेव बस आहे. गत वर्षभरापासून कोरोनाचे कारण सांगून बससेवा बंद आहे. ती पूर्ववत करण्याची मागणी मेळघाट युवक काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत केवलराम काळे यांनी निवेदनाद्वारे केली.
मेळघाटातील नागरिकांना बसफेऱ्यांअभावी पायपीट करत तालुक्याचे ठिकाण गाठावे लागत आहे. परसापूर मार्गे धारणी जाण्यासाठी खासगी बस वाहतूकदार दुप्पट पैशांची आकारणी करतात. सध्या महाविद्यालये सुरू झाली असून, नागापूर, गौलखेडा, तेलखार, अंबापाटी, बोराळा, वाडपाटी, पायविहीर या मार्गावरील विद्यार्थ्यांना प्रवासासाठी पायपीट करावी लागत आहे. शेतकरी, मजूर वर्ग यांचीही स्थिती वेगळी नाही. यामुळे बससेवा सुरू करण्यात यावी, या मागणीचे यशवंत काळे यांनी परतवाडा आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले. यावेळी महासचिव तुषार गायन, शुभम गायकवाड, जय घोरे, सुजित भासकर, शुभम घोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.