लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या कामगार संघटनांच्या बैठकीत एसटीने स्वतःही उत्पन्न मिळविले पाहिजे, असे सांगून नाराजीसुद्धा व्यक्त केली होती. परंतु, चालू उन्हाळी हंगामाचा विचार केल्यास एसटीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून उत्पन्न वाढीसाठी काहीही प्रयत्न झाले नाहीत. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीसुद्धा वेगवेगळ्या ज्या घोषणा केल्या आहेत, त्या हवेतच असून, जे अधिकारी उत्पन्न वाढीसाठी व प्रवाशांसाठी केलेल्या विविध घोषणा अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार नाहीत त्यांना नारळ दिला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
बरगे हे मंगळवार १० जून रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. यापूर्वी सुद्धा परिवहन मंत्र्यांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या. परंतु, सहा महिन्यांमध्ये कोणतीही ठोस कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. बहुतेक सर्व घोषणा हवेत विरल्या असून, केवळ मंत्र्यांसमोर मान हलवणाऱ्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांना नारळ द्यावा आणि त्यांच्या जागी सकारात्मक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणीही बरगे यांनी यावेळी कोणती योजना कोणत्या विभागाने करावी या संदर्भात घोळ घातला जात आहे. काही अधिकारी हे काम माझे नाही, दुसऱ्याचे आहे, असे टोलवाटोलवीचे उत्तर देत आहेत. अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांना हटवून त्यांच्या जागी कार्यक्षम अधिकारी नेमले पाहिजेत. जेणेकरून प्रवासी व कर्मचाऱ्यांना सुविधा देणे शक्य होईल, असे मतही बरगे यांनी व्यक्त केले.