२१ जणांचा सहभाग, आत्मनिर्भर भारतचा उदघोष, १५० किमी प्रवास
अमरावती : शेगाव हे प्रत्येक भाविकाचे आवडते डेस्टिनेशन. कोरोनाकाळात बंद असलेले हे मंदिर सायकलने गाठून, कोरोनाने चढलेला आळस झटकण्याचे आवाहन अमरावतीकरांनी केले. २१ जणांच्या या चमूत २५ ते ५० वर्षे वयोगटातील युवक होते. निवृत्त मेजर राजेंद्रसिंह बघेल व महाराष्ट्र ग्राम दर्पणचे रविराज देशमुख यांनी सायकलवारीचे नेतृत्व केले.
राजकमल चौकात २९ जानेवारी रोजी नगरसेवक चेतन पवार, भाजप शहराध्यक्ष किरण पातूरकर, उपमहापौर कुसुम साहू, गजानन देशमुख आदींच्या उपस्थितीत सायकल वारीला हिरवी झेंडी देण्यात आली. गाडगेनगराहून चांगापूर मार्गे सायकलवारीतील युवक निघाले. मार्गात वलगाव, चांगापूर, भातकुली, दर्यापूर येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. दहिहांडा येथे सोपीनाथ महाराज मंदिरात या चमूने मुक्काम केला. यानंतर निंबा फाटा येथील पेट्रोल पंपावर तसेच चोहोट्टा बाजार येथे स्वागत करण्यात आले. ३० जानेवारीला ४ ते ५ या वेळेत मिळालेल्या दर्शन पासनुसार शेगावला सायकलवारीने पोहोचलेल्या अमरावतीकर युवकांनी संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. दीडशे किलोमीटरचा हा प्रवास सुखद अनुभूती देणारा होता. परतीचा प्रवास सोबत नेलेल्या साहित्याच्या वाहनातून केल्याचे रविराज देशमुख यांनी सांगितले.
----------
पुढील वर्षी महिलांची सायकलवारीसायकलवारीत नऊ वर्षांची चिमुकली खुशी राजेंद्रसिंह बघेल ही वडिलांसोबत गेली होती. नोंदणी केलेल्या १०० सायकलस्वारांपैकी कोरोनामुळे सर्वप्रथम नोंदणी केलेल्या २१ जणांनिशी प्रवास करण्याचे निश्चित करण्यात आले. पुढील वर्षी महिलांना सोबत घेऊ. मात्र, प्रवासाचे अंतर जास्त असल्याने त्यांच्याकडून आधीपासून तयारी करून घ्यावी लागेल, असे देशमुख म्हणाले.
------------------
मंदिर व्यवस्थापनाकडून व्यवस्थेचा आदर्श
शेगाव संस्थान चोख व्यवस्थापनासाठी जाणले जाते. त्यानुसार अमरावतीकर सायकलस्वारांनी समाधी दर्शन आटोपले तोच त्यांच्याकरिता जेवण तयार होते. ऑटोमॅटिक वॉश बेसिन, सॅनिटायझर मशीन, साबणाचा वापर, सहा फुटांचे अंतर या बाबी मंदिर परिसरात प्राधान्याने पाळल्या जातात, असे देशमुख यांनी सांगितले.