दुकाने बंद; नागरिक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:00:32+5:30
जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. हे रोखण्याकरिता शासन प्रयत्नशील असून कोरोना विषाणूची साखळी तोडण्याकरिता आठवड्यातील प्रत्येक शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यूचे आयोजन केले असून सर्वच बाजारपेठा बंद ठेवण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता यावर उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी व रविवारी जिल्हाभर जनता कर्फ्यूचे आयोजन केले आहेत. परंतु मोर्शी शहरात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. हे रोखण्याकरिता शासन प्रयत्नशील असून कोरोना विषाणूची साखळी तोडण्याकरिता आठवड्यातील प्रत्येक शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यूचे आयोजन केले असून सर्वच बाजारपेठा बंद ठेवण्यात येत आहेत. जेणेकरून नागरिक घरातच राहील व कोरोनाची साखळी खंडित होईल, अशा मार्गदर्शक सूचनासुद्धा प्रशासन व शासनाच्या वतीने वेळोवेळी देण्यात येत आहेत. परंतु मोर्शी शहरात शनिवारी व रविवारी सर्व प्रकारची प्रतिष्ठाने बंद असली तरी काही हॉटेल, चहा विक्रेते आपली दुकाने सकाळच्या सत्रात सुरू ठेवतात. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत आहेत. त्याचबरोबर दिवसभर नागरिक या-ना त्या कारणाने शहरातील मुख्य रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. शहरातील मुख्य चौक असलेला सिंभोरा व जयस्तंभ चौकात जनता कर्फ्यूच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिक व वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. नागरिकसुद्धा या दोन्ही दिवशी गप्पागोष्टी करण्यासाठी या चौकात गर्दी करीत असल्याचे दिसून येते. मोर्शी शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्यासुद्धा दोन अंकी आकडा पार करून जात असल्याने नागरिकांनी उपायोजना म्हणून घरी राहणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून मोर्शी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे असल्यावरसुद्धा मोर्शी शहरातील काही नागरिक हलगर्जीपणा करताना दिसून येत आहे. पर्यायाने मोर्शी शहरात जनता कर्फ्यूच्या दिवशी नागरिकांची शहरात मोठी गर्दी दिसत आहे. अशा नागरिकांवर प्रशासनाच्यावतीने वचक बसविणे गरजेचे झाले आहे.