अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायत निवडणुका होऊन १५ दिवस झाले. आता सरपंचपदासाठीची आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया ४ फेब्रुवारीनंतर संपुष्टात येईल. त्यानंतर १० ते २० फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीची निवड प्रक्रिया राबविली जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
१४ तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, मतदान प्रक्रिया व निकालाची प्रक्रिया आटोपल्यानंतर आता सरपंचपदाचे आरक्षणसुध्दा काढण्याची प्रक्रियाही संपत आली आहे. त्यामुळे गावोगावी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना सरपंच, उपसरपंचपदाचे वेध लागले आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सरपंचपद हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुला व सर्वसाधारण अशा प्रवर्गासाठी आहेत. यातील काही पदे महिलाकरिता राखीव आहे. यानुसार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड प्रक्रिया होणार आहे. आता महत्त्वाचा टप्पा असलेल्या सरपंचपदासाठी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये इच्छुकांची जोरदार रस्सीखेच दिसून येणार आहे. विशेष म्हणजे सरपंचपदावर विराजमान हाेण्यासाठी पॅनेलप्रमुखांच्या घरी इच्छुकांच्या बैठका वाढू लागल्या आहेत.
बॉक्स
कार्यक्रमाकडे लक्ष
सरपंचपदासाठीची आरक्षण सोडतीची प्रक्रिया आटोपताच ५५३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाची निवड प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात याबाबत कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्यामुळे सरपंचपदाच्या निवड प्रक्रियेच्या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.