सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
कुऱ्हा : श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील वर्धा नदीच्या पुलाचे कठडे पुराच्या पाण्याने क्षतिग्रस्त झाले आहेत. यामुळे लहान-मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
कौंडण्यपूर येथील वर्धा नदीवरील पूल हा अमरावती व वर्धा या दोन जिल्ह्यांंना जोडतो. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे वर्धा नदीला पूर जाऊन पुलाचे सुरक्षा कठडे वाहून गेले होते. तेव्हापासून या पुलावरील कठडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या पुलावरून जीव मुठीत ठेवून मार्गक्रमण करावे लागते. या पुलावरून नदीपात्रात काही जण कोसळल्याच्या घटनासुद्धा समोर आल्या आहेत. त्यामध्ये दोन जणांना बळी गेला. विशेष म्हणजे, वर्धा नदीचे पात्र खोल असल्याने भविष्यात मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कौंडण्यपूर येथील वर्धा नदीवरील सुरक्षा कठड्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.